प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
विधि- अप्राप्त किंवा अपूर्व गोष्टीचें बोधन करून देणाऱ्या वाक्याला 'विधि' असें म्हणतात.
उदाहरण- 'अग्निहोत्रं जुहुयात्स्वर्गकाम: 'स्वर्गकाम पुरूषानें अग्निहोत्रानें स्वर्ग मिळवावा.
कांहीं ठिकाणीं याग अन्य वाक्यानें प्राप्त असून केवळ गुणमात्र विधान असतें त्यास 'गुणविधि' असें म्हणतात.
उदाहरण:- 'दध्ना जुहुयात्' येथे 'अग्निहोत्रं जुहुयात्' या वाक्यानें होम विहित आहे. .त्यांत दधिविधान फक्त 'दध्ना जुहुयात्' या वाक्यानें केलें आहे. यास गुणविधि असें म्हणतात.
ज्या ठिकाणीं गुण आणि याग या दोहोंचें एकदम विधान असतें त्यास 'उभयविधि' असें म्हणतात.
उदाहरण:- 'सोमेन यजेत' या ठिकाणीं सोम आणि याग यांचें एकच वाक्यानें विधान आहे.
विधींचे चार प्रकार आहेत.
[१] उप्तत्तिविधी [३] अधिकारविधि
[२] विनियोगविधि [४] प्रयोगविधि
आतां या प्रत्येक विधि भेदाकडे वळूं.
[१] उप्तत्तिविधी- कर्मस्वरूपाचें ज्ञान करून देणाऱ्या विधिस 'उप्तत्तिविधी' असें म्हणतात.
उदाहरण:- 'अग्निहोत्रं जुहोति'
वस्तुत: द्रव्य आणि देवता हें कर्माचें स्वरूप आहे. ते दोनहि ज्या ठिकाणीं सांगितले अस तील त्यालाच उप्तत्तिविधी म्हणतां येणार नाहीं तथापि होमरूप कर्मस्वरूपाचा बोध या वाक्यानें होत आहे.म्हणून यास'उप्तत्तिविधी' असें म्हणतात.
[२] विनियोगविधि- अंग आणि प्रधान संबंधबोधक विधीला विनियोगविधि असें म्हणतात.
उदाहरण:- 'दध्ना जुहोति'
या वाक्यांत तृतीयाविभक्तीनें ज्याचा अंगभाव उघड झाला आहे अशा दह्याचा होमाशीं संबंध दाखविला आहे.
अं ग प्र धा न सं बं ध स्प ष्टी क र णा पू र्वीं प्र मा ण वि ष य क वि ष यां त र- या विधीस सहाय्यभूत सहा प्रमाणें आहेत.तीं खालील प्रमाणें :-
[१] श्रुति म्ह. वेदवाक्य,स्वयंमहत्वाचा शब्द.
[२] लिड्.ग म्ह. यौगिक अर्थापेक्षां अधिक अर्थ.
[३] वाक्य म्ह. शब्दाची सापेक्षात.
[४] प्रकरण म्ह.वाक्यांची सापेक्षात.
[५] स्थान म्ह. संदर्भ.
[६] समाख्या म्ह.यौगिक अर्थ.
या सहा प्रमाणांच्या सहाय्यानें अंगत्व ठरविलें जातें.या प्रमाणांचे स्पष्टीकरण सविस्तर केलें पाहिजे.क्रमानें दुर्बल अशीं हीं प्रमाणें आहेत;आणि त्यांचें दुर्बलत्व युक्तिसिद्ध आहे.
[१] श्रु ति:- श्रुति=निरपेक्ष शब्द. ज्याच्या प्रामाण्याविषयीं कशाचीहि अपेक्षा लागत नाहीं त्यास 'श्रुति' असें म्हणतात.
श्रुतीचे तीन प्रकार आहेत.
[अ] विघात्री श्रुति [इ] विनियोक्त्री श्रुति
[आ] अभिधात्री श्रुति
विधात्री म्हणजे क्रियापदाचा विधायक असा लिंगादि भाग [लिङग ही विध्यर्थाची प्राचीन संज्ञा आहे. अशी प्रत्येक कालाला लकारात्मक संज्ञा आहे].
अभिधात्री म्हणजे 'व्रीहिणा यजेत' वगैरे श्रुति. अभिधात्री म्हणजे वाचक.
विनियोक्त्री म्हणजे जिच्या श्रवणानेंच संबंध कळतो त्या श्रुतीस विनियोक्त्री असें म्हणतात.
या श्रुतींचे तीन प्रकार आहेत.
(अ)विभक्तिरूपा विनियोक्त्री
(आ)समानाभिधानरूपा विनियोक्त्री
(इ)एकपदरूपा विनियोक्त्री
(अ)विभक्तीरूप विनियोक्त्री श्रुतीनें'व्रीहिभिर्यजेत'या ठिकाणीं विनियोग झाला आहे.
रोहिण्या पिंगलयैकहायन्या सोमं क्रिणाति (तै.सं.७.१.६.२).
'तांबडी पिंगट डोळयाची आणि एक वर्षाच्या गाईनें सोम विकत घ्यावा' हें तृतीया विभक्तीनें अंगत्व आल्याचेंच उदाहरण आहे.
(आ)'पशुना यजेत' या ठिकाणीं 'पशुना' या शब्दानें पुंस्त्व आणि एकत्व बोधलें आहे. म्हणून समाभिधान श्रुतीनें त्यांनांहि कारकांगत्व आलें आहे.
(इ)त्याचप्रमाणें 'यजेत' यांतील एकवचनाचा एकपद श्रुतीनें 'यज्' धातूवर अन्वय झाला आहे.
श्रुति लिंगापेक्षा प्रबल आहे. कारण, श्रुतीनें ज्या ठिकाणीं विनियोग असतो तेथें विनियोग विभक्ति वगैरे प्रत्यक्ष असते. परंतु लिंगामध्यें त्या विनियोजकाची कल्पना करावी लागते. कल्पना करीतोंपर्यत श्रुतीन विनियोगहि होऊन जातो. म्हणून लिंगापेक्षां श्रुतिप्रमाण प्रबल आहे.
उदाहरणार्थ- 'ऐन्घ्रा गार्हपत्यमुपतिष्ठते' इन्द्रदेवताक मन्त्रानें अग्नीला स्तवावें' असें सांगतिलें आहे.
'कदाचन स्तरीरसि नेन्द्र सश्चसि दाशुषे'हे इन्द्रा, (हविर्भाग) देणाऱ्यास तूं केव्हांहि मारीत नाहींस (तर त्याच्या संरक्षणास) जातोस.'
येथें लिंगावरून इन्द्रस्तुतीकडे विनियोग करण्यापूर्वीच 'ऐन्द्द्रा गार्हपत्यमुपतिष्ठते' या श्रुतीनें अग्निस्तुतीकडे विनियोग झाला.
यावरून लिंगापेक्षा श्रुति प्रबल आहे हें सिद्ध झालें.
[२] लिं ग– शब्दसामर्थ्याला लिंग असें म्हणतात.
उदाहरण- 'बर्हिर्देवसदनं दामि''देवांनां आसनभूत दर्भ तोडतो.' हा मन्त्र लवनक्रियेचा अंगभूत आहे. कारण, हा मन्त्र लवनप्रकाशन करण्यास समर्थ आहे.
समाख्या आणि लिंग यांमध्यें यौगिक आणि रूढि या प्रकारचा भेद आहे. यौगिक शब्दाला समाख्या म्हणतात; आणि रूढिरूप शब्दसामर्थ्य लिंगामध्यें असतें.
हें लिंग वाक्यादिकांपेक्षा बलवान् आहे. कारण, वाक्यादिकांपेक्षां लिंगावरून श्रुतिकल्पना तत्काल शक्य असल्यामुळें आणि वाक्याला लिंग व लिंगावरून श्रुति अशा जास्त कल्पना कराव्या लागत असल्यामुळें वाक्यापेक्षां लिंग हें प्रबळ होय.
म्हणूनच 'स्योनं ते सदनं कृणोमि घृतस्य धारया सुवेशं कल्पयामि'' भो पुरोडाश तुझें स्थान सुखकर करितों आणि तुपाच्या धारेनें सुसेव्य करितों'तेथें प्रसन्न मनानें येऊन बस.
हा मन्त्र'सदनं कृणोमि'या लिंगावरून पुरोडाश ठेवण्याचें स्थान तयार करण्याकडे विनियुक्त करावयाचा. 'तस्मिन्सीद' या वाक्यशेषावरून पुरोडाश ठेवण्याकरितां त्याचा उपयोग करावयाचा नाहीं.
[३] वा क्य- विशेष्य विशेषणांचें जें सहोच्चारण त्यास वाक्य असें म्हणतात.
उदाहरण- 'यस्य पर्णमयी जुहूर्भवति न स पाप श्लोक शृणोति'.
'ज्याची पानाची जुहू असते त्याचें यश मलिन होत नाहीं.'
येथें 'पर्णमयी' जुहूचें विशेषण आहे आणि त्याचें सहोच्चारण आहे. त्यावरून पर्णतेला जुहूचें अंगत्व प्राप्त झालें आहे. म्हणजे जुहू पानाचीच पाहिजे असें यावरून ठरलें. वाक्य प्रकरणापेक्षां केव्हांहि बलवान् आहे. कारण प्रकरणाला आकांक्षेची जरूरी असते; परंतु वाक्याला कशाचीहि अपेक्षा नसते.
उदाहरण.- 'इन्द्राग्नी इंद हविरजुषेतां महो ज्याजोऽ क्राताम्'
'इन्द्राग्नी' या लिंगावरून हा मन्त्र दर्शांग आहे.आणि त्याच वाक्यांत 'इंद हविराजुषेताम्' हें वाक्य असल्यामुळें दर्शोत त्याचा विनियोग झाला. प्रकरणावरून दर्शपूर्णमासांग झाला नाहीं. यावरून प्रकरणापेक्षां वाक्य बलवान् आहे हें सिद्ध झालें.
[४] प्र क र ण.- परस्परांनां ज्या ठिकाणीं अपेक्षा असते त्या ठिकाणीं प्रकरणावरून त्यांचा अंगांगीभाव ठरविण्यांत येतो.
उदाहरण.- 'समिधो यजति' हें वाक्य ऐकल्याबरोबर असें वाटतें कीं, 'समिद्दागानें काय करावयाचें, आणि दर्शपूर्णमाससंबंधीं वाक्य ऐकलें म्हणजे असें वाटतें'हा दर्शपूर्णमासयाग कसा करावा. 'या प्रकारें जी उभयांची आकांक्षा तीवरून त्यांचा अंगांगीभाव होतो. आणि समिद्याग दर्शपूर्णमासाचा अंग आहे असें ठरतें. हें 'प्रकरण' केवळ क्रियेचेंच अंगत्व दाखविणारें असतें. द्रव्य किंवा गुण यांचें अंगत्व द्योतित करणारें नसतें.
प्रकरणाचे दोन प्रकार आहेत.
[१] महाप्रकरण
[२] अवान्तर प्रकरण
मुख्यभावनेसंबंधीं जें'प्रकरण'तें'महाप्रकरण'होय.
उदाहरण- 'प्रजाज'हे दर्शपूर्णमासाचे अंग बनतात.हें महाप्रकरणावरून होय .आणि 'अभिक्रमण' हें प्रयाजाचें अंग होतें तें अवान्तर प्रकरणावरून होय.
हें फक्त प्रकृतींतच संभवते.
प्रकृति म्हणजे ज्या ठिकाणीं समग्र अंगाचें विधान असतें ती होय . ज्या ठिकाणीं समग्र अंगाचें विधान नसतें मूंळ गोष्टी दुसरीकडून घेऊन फक्त विशेष गोष्टीचें विधान असतें त्यास विकृति असें म्हणतात.
दर्शपूर्णमास हें याचें सुंदर उदाहरण आहे.कारण त्यांत उभयकांक्षारूप प्रकरण चांगलें संभवतें.
प्रकरण हें स्थानापेक्षां प्रबळ आहे. उदाहरण-'अक्षैर्दीव्यति राजन्यम्'इत्यादि. 'फांसे खेळणें' वगैरे धर्म राजसूय यज्ञांतील अंगभूत अभिषेचनीय संज्ञक यागाच्या समीप पठित आहेत. तथापि स्थानद्दष्टीनें अभिषेचनीय यागाकडे त्यांचा विनियोग न करितां प्रकरणावरून राजसूयाकडेच विनियोग करावयाचा.यावरून स्थानापेक्षां प्रकरण बलवान् आहे असें सिद्ध झालें.
[५] स्था न- उच्चारणाच्या ठिकाणाला'स्थान'असें म्हणतात .'क्रम' हेंहि एक नांव आहे. त्यांत दोन प्रकार आहेत.
[१] पाठसादेश्य
[२] अनुष्ठान सादेश्य.
पाठ सादेश्यांतहि दोन प्रकार आहेत.
[१] यथासंख्यपाठ
[२] सन्निधिपाठ
उदाहरणें.--[१] ऐन्द्राग्नमेकादशकपालं निर्वपेत् [२] वैश्वानरं द्वादशकपालं निर्वपेत् इत्यादि क्रमानें सांगितलेल्या ज्या इष्टी त्यांच्या प्रत्येकीच्या याज्या आणि अनुवाक्या
[पुरस्ताल्लक्ष्मा पुरोनुवाक्या भवति उपरिष्टा ल्लक्ष्मा याज्या ।
(तै.सं.२. ६.२)
अर्थ:- मंत्राच्या पूर्वभागांत देवता लिंग असल्यास त्या मंत्रास 'अनुवाक्या' म्हणतात आणि उत्तर भागांत असल्यास 'याज्या' म्हणतात. इन्द्राग्नी रोचनादि या क्रमानें यथासंख्यानें सांगितल्या आहेत. त्या यथासंख्यानें घ्यावयाच्या.
जीं विकृत्यंगे प्राकृत अंगांचा अनुवाद करून विहित असतात. तीं सन्निधिपाठानें म्हणजे विकृतिसन्निध पठित असतात, म्हणून विकृतीचीं अंगें बनतात. याप्रमाणें पाठसादेश्यांपैकीं 'यथांख्यपाठ' आणि 'सन्निधिपाठ' यांचीं उदाहरणें झालीं.
आतां अनुष्ठान सादेश्याचें उदाहरण देऊं.
'अनुष्ठानसादेश्य' म्हणजे अनुष्ठानाचें विधान करण्याचें जें स्थल तेंच स्थल असलेला विधि. उदाहरण:- 'औपवसस्थ' [यज्ञाचा पूर्व दिवस] दिवशीं 'अग्निषोमीय' पशूचें अनुष्ठान आहे. त्याच दिवशीं जीं कृत्यें सांगितलीं त्यांत पंशूचे धर्म सांगितले आहेत. हे धर्म अग्नीषोमीय पशूचेच घेतले पाहिजेत. हें 'अनुष्ठानसादेश्या' नें लब्ध होतें.
समाख्येपेक्षां स्थान प्रबळ आहे. कारण, जेथें स्थानानें विनियोग असतो त्या ठिकाणी ज्यांचा अंगांगीभाव असतो त्या दोनहि पदार्थांचा देशसामान्य लक्षणसंबंध प्रत्यक्ष असतो. समाख्यविनियोगस्थलीं तसें नसतें. कारण, पदार्थ भिन्न स्थलीं कथित असतात.
[६] स मा ख्या.- समाख्या म्हणजे यौगिक शब्द. त्यांत दोन प्रकार आहेत.
[१] वैदिकी समाख्या
[२] लौकिकी समाख्या
'होतृचमस:' या शब्दावरून होत्यानें चमसपात्रानें सोमपान करावें लागतें.ही वैदिक समाख्या होय.
अध्वर्युकाण्डामध्यें जीं कर्मे सांगितलीं आहेत त्यांस 'आध्वर्यव' अशी संज्ञा-समाख्या-आहे म्हणून तीं कर्मे अध्वर्यूनें करावयाची असतात.
या प्रकारें अंगांगिभाव दाखविणारी सहा प्रमाणें आहेत.त्यांनी अंगत्व दाखविलें जातें आणि समिदादि अंगयागांनीं उपकृत असा अंगीदर्शपूर्णमासयाग केला जातो.
अं ग.- आतां अंगाविषयी जास्त विवेचन करूं.
अंग दोन प्रकारचे आहे.
[१] सिद्धरूप [२] क्रियारूप
सिद्धरूप अंग --
(१)उदाहरण- जातिविशिष्ट पशु आणि (२)संख्या विशेष हीं सिद्धरूपाचीं उदाहरणें होत. हे प्रत्यक्ष यागोपकारक असल्यानें द्दष्टार्थच होत. अद्दष्टार्थ नव्हते.
[२] क्रियारूप अंग दोन प्रकारचें आहे.
[अ] गुणकर्म अथवा संनिपत्योपकारक
[आ] प्रधानकर्म अथवा आसदुपकारक
[अ] कर्मोगद्रव्याला उद्देशून सांगितलेलें जें कर्म तें गुणकर्म किंवा संनिपत्योपकारक होय.
उदाहरण- 'व्रीहीन् प्रोक्षति'' व्रीहीन् अवहन्ति' इत्यादि वाक्यांनीं सांगितलेले अवघात, प्रोक्षण वगैरे.
गुणकर्माचे तीन प्रकार आहेत.
[१] द्दष्टार्थ
[२] अद्दष्टार्थ
[३] द्दष्टाद्दष्टार्थ
उदाहरण-[१] तण्डुलावहनन हें भाताचे तांदुळ करण्याकरितां सांगितलें आहे. त्याशिवाय त्याचा 'पुरोडाश' किंवा 'चरू' होणें शक्य नाहीं. म्हणून, हें अवहनन द्दष्टार्थ होय.
[२] प्रोक्षण हें अद्दष्टार्थ आहे.कारण त्याचा प्रत्यक्ष कांहींच उपयोग नाहीं.
[३] आणि पशु-पुरोडाश हे द्दष्टाद्दष्टार्थ होत.
कारण,पशुयागांतील किंवा पुरोडाशयागांतील देवतोद्देशाने द्रव्यत्याग अद्दष्टार्थ आहे; आणि देवतास्मरण हें प्रत्यक्ष यागोपयोगी म्हणून द्दष्टार्थ होय. यालाच 'आश्रयिकर्म' असें म्हणतात.
[आ] केवळ द्रव्यादिकांनां उद्देशून नसलेल्या विहित कर्माला 'आरादुपकारक' किंवा 'प्रधान कर्म' असें म्हणतात.
उदाहरण- 'समिधा यजेत' वगैरे प्रयाजयागद्रव्य किंवा यागस्वरूप या कोणलाहि आवश्यक म्हणून सांगितले नाहींत. कारण, त्यामुळें यागांत कमीजास्तपणा कांहींच दिसत नाहीं. त्यावरून तें कर्म अपूर्वाकरितां आहे असें सिद्ध होतें. या प्रकारें विनियोगविधीचें विवेचन संपलें आहे.
प्रयोगविधि.- कर्मे विलम्बरहित व्हावींत म्हणून जो विधि असतो त्यास 'प्रयोगविधि' असें म्हणतात.
अंगवाक्यांशीं एकवाक्यात पावलेला तो प्रधानविधिच म्हणावयास कांहीं हरकत नाहीं.
कर्मसातत्य चालू राहण्यास म्हणजे कर्मामध्यें अविलम्ब उत्पन्न होण्यास कर्माचा क्रम व्यवस्थित ठरावा लागतो. कोणते क्रम पूर्वी करावयाचें आणि कोणतें कर्म नन्तर करावयाचें हा क्रम निश्चित करण्याविषयीं सहा प्रमाणें आहेत.
ती खालीलप्रमाणें:-
[१] श्रुति म्ह.वेदवाक्यानुरूप क्रम.
[२] अर्थ म्ह.प्रयोजनानुरूप क्रम.
[३] पठन म्ह.पदार्थबोधक वाक्यानुरूप क्रम.
[४] स्थान म्ह.उपस्थित्यनुरूप क्रम.
[५] मुख्य म्ह.प्रधानकर्मानुरूप क्रम.
[६] प्रवृति म्ह.गौणांगांनुरूप क्रम.
[१] श्रुति - क्रमपर जें वेदवाक्य असतें त्यास श्रुति असें म्हणतात.
श्रुतिचे दोन प्रकार आहेत.
[अ] केवळ क्रमपर
[या] क्रमविशिष्टपदार्थपर
उदाहरण- 'वेदं कृत्वा वेदिं करोति' वेद म्हणजे दर्भूमुष्टिं निधान द्विगुणं कृत्वा अग्रभागे प्रादेशानन्तरं वध्वा अग्रणि छिनत्ति स वेद :'ती करून वेदि म्हणजे आहवनीय गार्हपत्य यांचेमध्यें हविर्द्रव्य ठेवण्याकरितां चार अंगुलें करलेली जागा, ती करितो. हें वाक्य केवळ क्रमपर आहे. 'कारण, 'वेदि' करण्याचें विधान करणें शक्य नाहीं कारण समासामध्यें उद्देशविधेयभावानें जें उच्चारण केलें आहे त्याचा भंग होईल, म्हणजे वाक्यभेद होईल. यालाच 'एकप्रसरताभंग' किंवा' अविभृष्टविधेयांशाख्य' दोष म्हणतात.
ही श्रुति इतर प्रमाणांपेक्षां बलवान् आहे. इतरांनां श्रुतिकल्पनद्वारा प्रामाण्य आहे आणि ह्या श्रुतीला कोणच्याहि कल्पनेची जरूरी नाहीं.
उदाहरण.- ज्योतिष्टोम यज्ञांत इन्द्र वायु वगैरे देवतांची पात्रें 'भाण्डीं'सांगितलीं आहेत .त्यांत आश्र्विनपात्र तृतीय स्थानीं पठित आहे. म्हणून पाठक्रमानें तिसरें आलें आहे. तथापि, ‘अश्विनो दशमो गृह्यते' या श्रुतिवाक्यावरून तें पात्र दहावें घ्यावयाचें.
[२] अर्थ- ज्या ठिकाणी प्रयोजनावरून क्रमनिर्णय केलेला असतो त्यास 'आर्थ' क्रम असें म्हणतात.
उदाहरण.- अग्निहोत्रहोम आणि यवागुपचन
यांपैकीं (यवागु) पातळ भात किंवा पेज शिजवणें हें प्रथम झालें पाहिजे .कारण, यवागु होमाकरितां तयार पाहिजे आहे. म्हणून कार्यदृष्टीनें ती प्रथम शिजवतात .हा क्रम पाठक्रमापेक्षां बलवान् आहे.पाठक्रम स्वीकारल्यास प्रथम होम करावा लागेल आणि नंतर यवागु शिजवावी लागेल. होमानंतर यवागु शिजवल्यास यवागुचा कांहींहि उपयोग होणार नाहीं. अदृष्ट फल आहे असेंहि मानतां येत नाहीं; कारण, दृष्ट संभवत असतांना अदृष्टाची कल्पना करावयाची नाहीं.
[३] पठन- पदार्थबोधक वाक्यांचा जो क्रम त्यास पाठक्रम म्हणतात.हा पाठक्रम दोन प्रकारचा आहे.
[अ] मंत्रपाठ [आ] ब्राह्मणपाठ
उदाहरण.- अग्नि आणि अग्निषोम यांसंबंधीं ज्या'याज्या'आणि 'अनुवाक्या' [पुरस्ताल्लक्ष्मा पुरोनुवाक्या भवति उपरिष्टाल्लक्ष्मा याज्या।(तै.सं.२.६.२)-मंत्राच्या पूर्वभागांत देवतालिंग असल्यास त्या मंत्रास 'अनुवाक्या' म्हणतात; आणि उत्तरभागांत असल्यास 'याज्या' म्हणतात] त्यांच्या क्रमावरून प्रथम अग्नि आणि नंतर'अग्निषोम'यांसंबंधी अनुष्ठान करितात.हें मन्त्रपाठावरून करितात.
[आ] ब्राह्मणपाठावरून जो क्रम ठरवितात त्यास ब्राह्मणपाठक्रम असें म्हणतात.
उदाहरण-प्रयाजापैकीं'समिधो यजति''तनूनपातं यजात'वगैरें कर्मे ब्राह्मणांतील क्रमावरून करावयाचीं .कारण, त्यांनां स्मारक मंत्रपाठ नाही. ज्या ठिकाणीं स्मारक मंत्रभाग आहे त्या ठिकाणीं ब्राह्मणभागावरून कांहींहि करण्याची आवश्यकता नाहीं.
ब्राह्मणभाग केवळ अमुक करावें यापेक्षां जास्त कांहींच सांगत नाहीं; परंतु मन्त्र हे प्रयोगकालीं त्या त्या क्रमाचें स्मरण करून देणारे असतात. म्हणून मंत्रभाग हा अन्तरंग होय.
याविषयीं र्वात्तिककारांनीं सांगितलें आहे कीं-
प्रयाजादिवाक्यान्यर्थे समर्प्यं चरितार्थनि
स्वरूपसंस्पर्शे सत्यपि प्रयोज्यतां न प्रतिपद्यंते
[४] स्था न क्र म.—चवथा 'स्थानक्रम' होय. प्रकृतींतील नाना ठिकाणच्या पदार्थांचें विकृतिमध्यें अनुष्ठान कर्तव्य असतां ज्याच्या स्थलीं अनुष्ठान करावयाचें. त्याचें प्रथम आणि अतिदिष्टाचें नंतर अनुष्ठान करावयाचें हा जो क्रम, यास 'स्थानक्रम' असें म्हणतात.
'स्थान'म्हणजे'उपस्थिति'.ज्याच्या ठिकाणीं अनुष्ठान,त्याचें अनुष्ठान झाल्यानंतर ज्याची'उपस्थिती'होते त्याचें अनुष्ठान करणे हें योग्य होय.
उदाहरण:- साद्यस्क्रयागामध्यें अग्निषोमीय-सवनीय-आणि अनुबन्ध्य यांचे सवनीयामध्ये अनुष्ठान करण्याची वेळ आली असतां सवनीय पशूंचे प्रथम अनुष्ठान करावयाचें. नंतर इतर दोन पशूंचे करावयाचें. कारण तो सवनीयप्रदेश आहे, इतरांचा नव्हे.
हे तीनहि पशू,ज्योतिष्टोमांतील आहेत. त्यांचे ज्योतिष्टोमांत दिवसहि वेगवेगळे आहेत. औपवसथ्य दिवशीं अग्निषोमीय पशु, सुत्याकालीं सवनीय पशु, आणि आनुबन्ध्य शेवटीं.
'साद्यस्क'हा सोमयागविशेष आहे.तो ज्योतिष्टोमाचा विकार आहे. 'प्रकृतिवद्विकृति:कर्तव्या' या न्यायानें तीन पशुयाग साद्यस्क्रांत प्राप्त झाले. तेथें त्यांचे'सह पशून् आलभेत्'असें श्रुतीनें साहित्य सांगितलें आहे. तेथें सवनीयाला प्रधानसंबंधानें मुख्यत्व आलें आहे. म्हणून त्यांचे अनुष्ठान करून इतरांचें अनुष्ठान नंतर करावयाचें. याशिवाय कोणताहि क्रम स्वीकारल्यास कांहीं अत्यन्त विप्रकृष्ट व कांहीं मुख्य कर्मांशीं अत्यन्त अव्यवहित होऊं लागतील.असें होणें हें कर्मसात्याच्या द्दष्टिने अत्यन्त अयोग्य होय.
[५] मु ख्य.- प्रधानक्रमानें जो अंगाचा क्रम घेतात त्यास मुख्यक्रम असें म्हणतात.
ज्या क्रमानें प्रधानकर्म केलें जातें त्याच क्रमानें अंगकर्मांचेंहि अनुष्ठान केल्यास प्रत्येक अंगाचें प्रधानाशीं तुल्य व्यवधान राहतें. उलट अनुष्ठान केल्यास कांहीं ठिकाणी पूर्ण अव्यवधान आणि कांहीं ठिकाणीं अतिशय व्यवधान होईल. आणि त्यामुळें बिलकुल वेळ न जातां प्रयोग झाल्यानें कर्मांत जो सुव्यवस्थितपणा उत्पन्न होतो तो नष्ट होईल. म्हणून प्रधान क्रमाप्रमाणेंच अंगक्रमहि मानला पाहिजे.तसें केल्यानें पुढील कर्मांत आरंभ कोठून करावा यासंबंधी अनवस्थाप्रसंग टळतो
उदाहरण.--प्रयाजशेष धृतानें प्रथम अग्निसंबंधी हवीचें अभिधारण करावयाचें. आणि नंतर इन्द्रसंबंधी दहयाचें अभिधारण करावयाचें कारण, ते दोनहि क्रमानें आहेत आणि त्याच क्रमानें हवन करावयाचें.
या क्रमाने कर्म केल्यास त्यांत कांहीं व्यवधान उत्पन्न होत नाहीं.फक्त एकान्तरि कृत्य होतें. तें जास्त व्यवधानांपेक्षा सह्य होय,
वरील म्हणणें स्पष्ट होण्यास खालीलप्रमाणें क्रम मांडावा.
१. आग्नेयहवीचें अभिधारण
२. ऐन्द्रहवीचें अभिधारण
३. आग्नेययाग
४. ऐन्दयाग
हा मुख्य क्रम होय.हा मुख्य क्रम पाठक्रमापेक्षां दुर्बल आहे.कारण मुख्य क्रम अन्य प्रमाणनें प्रधान क्रम ठरवून त्याला अनुसरून जाणारा असतो.पाठक्रमाला स्वाध्यायक्रमपेक्षां कशाचीहि जरूरी नसते.
उदाहरण.- म्हणूनच आग्नेययाग,उपांशुयाग आणि अग्निषोमीययाग हे याग जरी क्रमानें अनुष्ठान केले जातात तरी उपांशुयागसंबंधीं आज्यनिर्पाव मुख्य क्रमाप्रमाणें प्रथम न करितां पाठक्रमाप्रमाणें नंतर केला जातो.कारण,पाठक्रम मुख्य क्रमापेक्षां प्रबल आहे.
हा 'मुख्यक्रम' प्रवृतिक्रमापेक्षां बलवान् आहे.कारण,'प्रवृत्तिक्रम'स्वीकारला असतां पुष्कळ अंगांनां प्रधानाशीं विप्रकृष्ट व्हावें लागतें.आणि मुख्यक्रम स्वीकारल्यास उलट सन्निकर्ष प्राप्त होतो.
[६] प्र वृ ति क्र म.- म्हणजे एकदम करण्यात सांगितलेलीं जीं प्रधानकार्मे त्यांत प्राप्त झालेल्या अंगाच्या आवृत्ती. ज्या प्रसंगी द्वितीय वगैरे पदार्थाचा क्रम, प्रथम पदार्थाच्या क्रमाला अनुसरून करावयाचा.
उदाहरण.- वाजपेय यज्ञांत 'सप्तदश प्राजापत्यान् पशून् आलभते'या तै.ब्रा.तील वाक्यानें सतरा पशूंचें आलभन सांगितलें आहे. आणि त्यांचें अनुष्ठान साहित्यानेंच झालें पाहिजे असें'वैश्वदेवीं कृत्वा प्राजापत्यैश्चरन्ति'या वाक्यानें सांगितलें आहे.
ते सतरा पशू एक देवतेला उद्देशून असल्यामुळें त्यांचें सहानुष्ठान शक्य आहे.परंतु उपाकरणादिक ज्या अनेक क्रिया सांगितल्या आहेत त्यांचें एकाकालीं सतरा पशूंचें 'उपाकरण'शक्य नाहीं.म्हणून त्या कर्मांचें साहित्य अवव्यधानानें कर्म करून संपादन केलें पाहिजे.
याकरितां पहिल्या पदार्थाचें अनुष्ठान ज्या क्रमानें केलें त्याच क्रमानें दुसऱ्या, तिसऱ्या वगैरे पदार्थांचें अनुष्ठान केल्यास हें साहित्य होणें शक्य आहे.तसा क्रम स्वीकारल्यास कोणामध्येंहि कमीजास्त व्यवधान होणें शक्य नाहीं.
याप्रकारें क्रमासंबंधी सहा प्रमाणांसहित प्रयोगविधीचें निरूपण संपलें आहे.
अधिकार विधि- कर्मापासून उत्पन्न होणारें फल कोणी भोगावें हें बोधित करून देणारा जो विधि त्यास अधिकार विधि असें म्हणतात.
उदाहरण-'यजेत स्वर्गकाम:'यावरून स्वर्गकाम पुरूष यज्ञापासून उत्पन्न होणारें फल भोगणारा आहे. अर्थात् यज्ञ करण्यास अधिकारी आहे असें दिसतें.
दुसरें उदा.-'यस्य गृहान् दहत्यग्नये क्षामवते अष्टाकपालं पुरोडाशं निर्वपेत्'ज्या आहिताग्नीच्या घराला आग लागेल त्यानें क्षामवत् अग्नीला'अष्टाकपाल पुरोडाश'द्यावा.
यावरून गृहदाहनिमित्तक कर्म करणाऱ्याचें पापनष्टत्व रूप फलाचें अधिकारित्व यांत दाखविलें जातें.
विधिवाक्यांत जीं पुरूषविशेषणें असतील तद्यृक्त असल्याशिवाय कर्माला अधिकारी होऊं शकत नाहींत.
उदाहरणार्थ.- 'राजा राजसूयेन स्वाराज्यकामो यजेत' या वाक्यावरून केवळ स्वराज्य इच्छिणाऱ्या माणसानें 'राजसूय' यज्ञ करून चालणार नाहीं,तर तो राजा असावयास पाहिजे. राजा असून जो स्वराज्येच्छु असेल त्यानेंच राजसूय यज्ञ करावा असें सिद्ध झालें.
कांहीं तर पुरूषाचीं विशेषणें म्हणून अश्रुत असणारीहि पदें विशेषणत्वानें स्वीकारलीं जातात.
उदाहरणार्थ -[१] अध्ययनप्राप्त विद्या
[२] आधानसिद्ध अग्नि
[३] सामर्थ्य
[१] अध्ययनविधिसिद्ध अशी विद्या असल्याशिवाय अर्थज्ञान असणें शक्य नाहीं. आणि अर्थज्ञान असल्याशिवाय कर्म करितां येणें शक्य नाहीं. म्हणून अध्ययनप्राप्तविद्या पाहिजे .पूर्वी वेदाचें सार्थच अध्ययन होत असे, असें अनेक पुराव्यांवरून दिसतें.
[२] आधानसिद्ध अग्नीहि पाहिजे. त्याशिवाय अग्निसाध्य कर्मे होणें शक्य नाहीं. शूद्रादि लोकांनां यागादि कर्मोचा अधिकार नाहीं. कारण उपनयन ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांनांच सांगितलें आहे. शूद्रादिकांनां सांगितलें नाहीं.
उपनीताशिवाय वेदाध्ययन करावयाचें नाहीं. आणि वेदाध्ययनाशिवाय यज्ञधिकार नाहीं.
तसेंच [वसन्ते ब्राह्मणोऽग्नीनादधीत ग्रीष्मे राजन्य:शरदि वैश्य:। तै.ब्रा.१.१.२.] अग्न्याधानहि ब्राह्मण, क्षत्रिय, आणि वैश्य यांशिवाय कोणास करितां येत नाहीं.
अर्थात् उपनयन, अध्ययन, व अग्न्याधान यांपैकीं कांहींहि नसल्यामुळें शूद्रांनां यागादिकाचा अधिकार नाहीं.
याचे उलट वेदामध्यें'वर्षासु रथकारोग्नीनादधीत''वर्षा ऋतूंत रथकारानें अग्न्याधान करावें.'
रथकार याची जाति पुढील कोष्टकावरून स्पष्ट होईल.
वैश्यकुमारी
पति | पत्नी | संतति[जात] |
राजा (क्षत्रिय) |
वैश्यकुमारी | माहिष्य |
वैश्यपति | शूद्री | करिणी |
माहिष्यपुत्र | करिणी कन्या | रथकार |
या रथकारानें आधान करावें असें जरी श्रुतीनें सांगितलें आहे, तथापि श्रुतिवाक्य म्हणून जरी आधानाचा अधिकार प्राप्त झाला तथापि आधानोत्तर कर्माविषयीं त्याला अधिकार नाहीं. कारण, अध्ययनविधिसिद्ध ज्ञानाचा त्याच्या जवळ अभाव आहे. केवळ श्रुतिविहित कर्मापुरताच फक्त आधार आहे असें सिद्ध होतें.
आतां स्त्रियांनां अधिकार आहे कीं नाहीं याहि प्रश्नाचा येथेंच विचार केला पाहिजे .'यजेत स्वर्गकाम:' इत्यादि ठिकाणीं 'स्वर्गकाम:'हें पद जरी पुल्लिंगी आहे तथापि क्रियेचें उद्देश दाखविणें यापेक्षां त्याचा हेतु नाहीं. लिंगाचाहि त्यावर अन्वय होतो; म्हणून तें लिंग अविवक्षित आहे. ही गोष्ट ग्रहैकत्वाधिकरणामध्यें शबरस्वामीनें चांगल्या प्रकारें सिद्ध केली आहे(३.१.७).
यावरून 'स्वर्गकाम' वगैरे ठिकाणचें पुंस्व अविवक्षित ठरलें म्हणजे स्त्रियानां यज्ञादि क्रिया करण्याचा सहजच अधिकार आहे असें सिद्ध होतें. सध्यां कलियुगांत स्त्रियांनां अध्ययनाचा निषेध आहे. म्हणून त्यांना अधिकार नाहीं ही गोष्ट निराळी परंतु त्यावरून त्यांनां अजिबात अधिकार नाहीं असें म्हणतां येत नाहीं.
‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ या स्मृतिवचनावरुनहि स्त्रियांनां स्वातंत्र्यानें अधिकार नाहीं असेंच दिसतें. अजिबात अधिकार नाहीं असें दिसत नाहीं.
दुसरी मुख्य अडचण ही आहे कीं केवळ स्त्री किंवा पुरूष यांचे योगानें यज्ञ साग्र होणें शक्य नाहीं.
यजमानानें यज्ञ आरंभल्यास त्या यज्ञांत विहित असलेलें पत्नीकर्तृक आज्यावेक्षण व पत्नीकर्तृक अज्ञांत पतिकर्तुक आज्यावेक्षण लुप्त होण्याचा प्रसंग येईल.
पतिपत्नींनां सहाधिकार आहे असें ठरविल्यानें वरील अडचण न येतां पति अध्ययन केलेला असल्यानें पत्नीविषयीं अज्ञानाची अडचणहि रहात नाहीं.
'पाणिग्रहणात्तु सहत्वं कर्मसु तथा पुण्यफलेषु'इत्यादि वचनेंहि त्याच द्दष्टिनें स्त्रियांनां अधिकार आहे असें प्रतिपादन करितात.
[३] अध्ययनानें प्राप्त झालेलें ज्ञान आणि आधानसिद्ध अग्नि ज्याप्रमाणें पाहिजे, त्याचप्रमाणें सामर्थ्यहि अवश्य पाहिजे. सामर्थ्यशिवाय साग्र विधि होणें शक्य नाहीं आणि साग्र विधि झाल्याशिवाय फल मिळणें शक्य नाहीं.
त्यामध्यें इतकाच भेद असतो कीं काम्यकर्मामध्यें अंग आणि प्रधान या दोनहि कर्माविषयीं कर्मकर्ता समर्थ असावयास पाहिजे आणि नित्यकर्मांत प्रधानकर्माविषयीं समर्थ असला तरी चालतो.सामर्थ्याची अवश्यकता मानिली नाहीं तर कर्म सांग होणार नाहीं उदाहरणार्थ :-अन्धळा मनुष्य यज्ञ करूं लागल्यास त्याचे कडून आज्यावेक्षण होणें शक्य नाहीं.म्हणून यजमान अन्धळा,लंगडा असतां उपयोगी नाहीं.
यज्ञविहित त्या त्या क्रिया करण्यास जी पात्रता असते तिलाच सामर्थ्य असें म्हणतात. यज्ञकर्म परिपूर्ण होण्यास त्याचीहि अत्यन्त अवश्यकता असते.
या प्रकारें अधिकारविधीसंबंधी माहिती आहे.
येथें चारहि विधीचें निरूपण संपलें.