प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.

स्थूल अवलोकन.- १९ व्या शतकाच्या प्रारंभीं बलिद्वीपांतील हिंदूंनीं ससकांवर स्वारी करून त्यांस जिंकले आणि ससक हें बेट बली बेटांतील हिंदु राजांचें मांडलिक १८३९  सालीं झालें. इ. स. १८९४ सालीं डच लोकांनीं ससक बेटावर स्वारी करून तेथील हिंदूंचें वर्चस्व नष्ट केलें आणि तेव्हांपासून आतांपर्यंत तें डच लोकांच्या ताब्यांत आहे.
यवद्वीपाचा हिंदुस्थानच्या इतिहासाशीं पुष्कळ संबंध येतो. तेथील हिंदु राजघराण्यांचा लग्नसंबंध सिंहलद्वीपांतील हिंदु राजघराण्यांशीं होत असे व राजकन्यांच्या प्राप्त्यर्थ लढायाहि होत असत, हें एका प्राचीन अरब प्रवाशानें लिहून ठेविलें आहे. (इलियटच्या ‘इतिहाससाधनांचा पहिला खंड’ पहा.) जाव्हा, बलि येथील ग्रंथांच्या भाषेला ‘कवि’ असें म्हणतात. कवि भाषेमध्यें भारतयुद्ध, अर्जुनविवाह इ. अनेक ग्रंथ आहेत, व जावानीज लोकांच्या कायद्यांचे मूळ ग्रंथ हिंदुच आहेत आणि आज लोक जरी मुसुलमान झाले आहेत, तरी ते पूर्वींचा हिंदु कायदाच वापरतात. मुसुलमान झाल्यामुळें जावानीज लोकांची सुधारणा झाली असें नव्हे. कां कीं, आज ते इतके दुर्बल आहेत कीं, प्राचीन मोठमोठालीं हिंदु देवालयें पाहुन अर्वाचीन जावानीज हीं कांहीं मानवी कृत्यें नाहींत असें समजतात. जावामधीर कांहीं गांवांची आणि संस्थानांचीं नांवें देखील तेथील हिंदु संस्कृतीचे अवशेष आहेत. उदाहरणार्थ, इंद्रमय हें गांव आणि सुरकर्ता आणि जुग्जकर्ता (युद्धकर्ता) हीं संस्थानें लक्षांत घ्यावींत. जावानीज जरी मुसुलमान झाले आहेत तरी तेथें, ससक सेलिबिस इत्यादि बेटांमध्यें असलेल्या मुसुलमानांप्रमाणें त्यांचा मुसुलमानीपणा दुर्बल आहे; म्हणजे त्यांच्यामध्यें पुष्कळ जुनीं दैवतें शिल्लक आहेत; आणि त्यांच्या चालीरीति इतर मुसुलमानांहून बर्‍याच भिन्न आहेत.