प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ५ वें.
चातुर्वर्ण्यसंस्थापन.

सुधारणादिग्दर्शन.- चातुर्वर्ण्यविषयक सुधारणा जर करावयाची असेल तर खालील गोष्टी आपणांस कराव्या लागतील.

१ धर्मविषयक शासनसंस्था निर्माण करणें.
२ वर उपस्थित केलेल्या चातुर्वर्ण्यविषयक अनेक प्रश्नांसंबंधानें  समाजांत जागृति उत्पन्न करणें.

चातुर्वर्ण्यसंस्थापना करण्यासाठीं काय खटाटोप केला पाहिजे यासंबंधानें वर जे विचार व्यक्त केले ते संस्करविषयक भेद रक्षावयाचा असतां काय काय करावें लागेल तें सांगण्याच्या दृष्टीनें केले. तथापि चातुर्वर्ण्यसंस्थापनेसाठीं वर सांगितलेला एकच मार्ग आहे असें मात्र नाहीं. चातुर्वर्ण्यसंस्थापना म्हणजे व्यक्तीस कार्यानुरूप समाजस्थान मिळण्याची व्यवस्था होय. हें समाजस्थान व्यक्त करण्यासाठीं संस्कार हा एक चिन्हविशेष आहे. कार्याच्या दृष्टीनें मनुष्याला पदवी एक आणि संस्काराच्या दृष्टीनें निराळी ही असंगति काढून टाकण्यासाठीं ज्या क्रिया ऐच्छिक तर्‍हेनें आपणांस करितां येतील त्या येणेंप्रमाणें:-
 
(१) सर्व समाजास सारखे म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मणाचे संस्कार करावे.
(२) वर्णविशिष्ट संस्कार अजीबात काढून टाकावे.
(३) प्रत्येक व्यक्तीचा वर्ण ठरवून त्यास त्याप्रमाणें संस्कार करावे.
 
या तीन प्रकारांपैकीं कोणताहि प्रकार अंमलांत आणल्यास चातुर्वर्ण्यसंस्थापना होईल.

श्रमविभागामुळें उत्पन्न होणारें चातुर्वर्ण्य राहणारच; आणि माणसें अमुक मनुष्य कोणत्या वर्णांतील आहे हें बाहेरच्या संस्कारांवरून ठरविण्याची खटपट न करितां प्रत्यक्ष कर्माच्या अवगमनानेंच ठरवितील.

१९२० च्या सप्टेंबरमध्यें नाशिक येथें जी हिंदुधर्मपरिषद भरविली गेली त्या प्रसंगीं वाईचे वे. शा. सं. महादेव शास्त्री दिवेकर यांनीं अशी सूचना आणली होती कीं सध्यांच्या संस्कारांतील चार मुख्य संस्कार निवडून ते सर्वसामान्य करावेत. हा विचार सर्वमान्य झाल्यास संस्कारविषयक भेद नष्ट होऊन त्या बाबतींतील असमता नाहींशी होईल आणि केवळ कर्मावरच वर्णस्थान राहण्याचें ध्येय जवळ झाल्यासारखें होईल.

संस्कार अजीबात बंद करणें किंवा संस्कार सामान्य करणें यांमध्यें अधिक ग्राह्य मार्ग संस्कार सामान्य करणें हा होय असें हिंदूंस स्वाभाविकपणेंच वाटेल. कां कीं, याच्या योगानें संस्कृत ग्रंथांशीं व जुन्या परंपरेशीं संबंध राहील.