प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २२ वें.
हिंदूंची उचल.

हिंदूंच्या उचलीचें सांस्कृतिक स्वरूप.- विजयानगरचे राजे, मराठे व शीख या तीन कार्यकर्त्यांच्या मार्फत हिंदूंची उचल झाली. त्यांचीं कार्ये कशीं काय झालीं याची तुलना करतां आपणास कांहीं भेद आढळून येतील. विजयानगरच्या राज्याचें कोणतेहि व्यवहारलेख आपणांस उपलब्ध नाहींत आणि त्यामुळें राज्याचीं धोरणें काय होतीं याविषयीं त्या त-हेचा पुरावा नाहीं तर त्या वेळेस ज्या विद्यारण्य माधवांनीं विजयानगरच्या राजाचें तंत्रीपण केलें त्यांच्या इतर कार्यावरून आणि इमारती वगैरे अवशेषांवरूनच या संबंधाचा निकाल करावयाचा आहे. शीख लोकांच्या प्रयत्नांच्या इतिहासाचें शिखांमध्यें अजून संशोधन व त्यावरचें शीख लोकांकडून तत्त्वें, धोरणें वगैरेंचें विवेचन चांगलें समाधानकारक झालेलें नाहीं. मराठे आणि बिजयानगरवाले व शीख यांतील मुख्य फरक कार्यक्षेत्राच्या व्यापकर्तेंत होय. विजयानगरनें गोदावरीच्या उत्तरेकडे लक्षच दिलें नाहीं, आणि शीखांस आपलें कार्य व्यापक करण्यास अवसर मिळाला नांहीं. कांहीं शीख संस्थानें बरेच दिवस मराठ्यांची मांडलिक होतीं, आणि शीखांचा सर्वांत कर्ता पुरूष जो रणजितसिंग याला देखील साम्राज्यविषयक भावना फारशी नसावी असें दिसतें. जेथें लाखो मराठ्यांच्या तलवारी इंग्रजांचें उन्मूलन करूं शकल्या नाहींत तेथें आपण काय करणार असे त्यानें उद्गार काढले आहेत. आणि इंग्रजांशीं स्नेह कायम ठेवून दुस-या कमी बलवान देशी राज्यांस गट्ट करावें अशी त्याची कार्यपद्धति होती. शीख हे हिंदुस्थानच्या मालकीसाठीं आखाड्यांत मुळींच उतरले नव्हते. भारतीय साम्राज्यासाठीं प्रयत्न या दृष्टीनें मराठ्यांच्या जोडीचें हिंदूकडून झालेलें कार्य पहावयाचें झाल्यास आपणांस हिंदुंस्थानाच्या इतिहासांत दोनच प्रयत्न दिसून येतात. एक प्रयत्न मौर्यांचा आणि दुसरा आंध्रभृत्यांचा मौर्यांचें राज्य संस्कृतीच्या इतिहासांत तर मोठेंच महत्त्वाचें आहे. मराठी राज्य जरी पुष्कळ अंशीं संस्कृतीनें विजयानगराहून देखील कमी दर्जाचें असलें तरी व्यापक कार्यक्रमाच्या बाबतींत अर्ध्या अधिक अंशानें महाराष्ट्रीय असलेलें आंध्रभृत्य आणि मौर्य यांखेरीज त्यांच्या तुलनेस कोणतेंहि राष्ट्र अगर राज्य बसवितां येत नाहीं.

विजयानगरचें कार्य व्यापकतेच्या दृष्टीनें जरी मराठ्यांच्या कार्यापुढें हीन दिसलें तरी दुस-या दृष्टीनें विजयानगरचें कार्य मोठें महत्त्वाचें आहे. जो संस्कृत विद्येचा विकास विजयानगरच्या प्रारंभकालांत झाला तत्तुल्यविद्याविकास लहानशा क्षेत्रांत व नियमित काळांत हिंदुस्थानच्या इतिहासांत भारतीय युद्धानंतर पुन्हां कोठें झाला नाहीं. विजयानगरचें राज्य संस्कृतिविकासाच्या दृष्टीनें महत्त्वाचें होतें.

शीख लोकांचा प्रयत्न हिंदूंच्या स्वायत्तशासनविकासाच्या दृष्टीनें जसा महत्त्वाचा आहे त्याहूनहि नैतिक आणि पारमार्थिक दृष्टीनें महत्वाचा आहे. कर्मकांडाशीं कायमचा संबंध तोडून ज्ञान व भक्ति यांस प्राधान्य देण्याचा प्रयत्न जितक्या निकराचा रामानंदशिष्यपरंपरेच्या या शाखेनें केला तितका त्यांच्या महाराष्ट्रीय शिष्यशाखेनेंहि केला नाहीं. आर्यसमाज पंजाबांत स्थापन होण्यापूर्वीं पंजाबमध्यें ज्या हिंदूंत कांहीं जीव दिसत होता ते हिंदू फक्त शीखच होत. धार्मिक चळवळीचा राज्यस्थापनेशीं संबंध महाराष्ट्रांत होता हें संत मंडळीच्या कट्ट्या कैवा-यांसहि सिद्ध करतां आलें नाहीं, पण पंजाबांत ती क्रिया घडून आली याविषयीं कोणी संशय घेत नाहीं.

मौर्यांचें साम्राज्य, आंधृभृत्यांचें साम्राज्य आणि मराठी साम्राज्य यांची तुलना केली असतां असें दिसतें कीं, मौर्य साम्राज्यकालीं पाली वाङ्मयास जोर मिळाला आणि तो अशोकानें भरविलेल्या संगीतीमुळेंच मिळाला असावा. अनेक सुत्ते केवळ भिक्षूंच्या स्मरणांत होतीं तीं त्या काळींच प्रथमतः अक्षररूपानें अवतीर्ण झालीं असावींत. बौद्ध तिपिटकाच्या संहितीकरणाचें श्रेय मौर्यांस आहे. आंध्रभृत्यांचें संस्कृतिविषयक कार्य म्हटलें म्हणजे माहराष्ट्रीय महत्त्व उत्पन्न करणें हें होय. मराठीसाम्राज्यानें मराठीस जरी लौकिक महत्त्व उत्पन्न केलें तरी त्यांनां मराठीवाङ्‌मयास हिंदुस्थानांतील इतर भाषांतील वाङ्मयापेक्षां निराळेपणा फारसा उत्पन्न करतां आला नाहीं. कांहीं बखरी व पोवाडे निर्माण झाले, पण मराठी बखरींची योग्यता मुसुलमानांच्या इतिहासग्रंथापेक्षां बरींच कमी आहे हें केव्हांहि कबूल केलें पाहिजे. मराठ्यांची संस्कृति त्यांनीं खालीं पाडलेल्या मुसुलमानांपेक्षां कमी दर्जाची होती आणि त्यांचा सर्व काळ युद्धांत गेल्यामुळें त्यांनां संस्कृतिसंवर्धनास फारसा काळ देतां आला नाहीं.