प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २४ वें.
भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा विकास.

वेदोत्तर वाङ्मयाचा विकास - वेद संपल्यानंतर सूत्र काल येतो. त्या वेळेस सूत्र हा शब्द मोठ्या पांडित्याचा सूचक झाला असल्यामुळें तो बौद्धांनीं उचलला. वेदांगें व त्यांशीं संबद्ध सूत्रवाङ्मय यांचें स्वरूप मागें दुस-या भागांत वर्णिलें आहे वेदांगें जशी वेदाभ्यासांतून निघालीं तशींच दर्शनेंहि वेदांपासून निघाली. दर्शनांत मीमांसा त्रयीपासून निघाली तर इतर दर्शनें उपनिषदांपासून निघालीं. सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय आणि वैशेषिक ही सहा दर्शनें उत्पन्न झालीं. यांपैकीं मीमांसाशास्त्र हें वस्तुतः भाषाशास्त्र आहे व त्याचें विवेचन इतर भाषास्त्रांबरोबर सापडेल.

ही सहा दर्शनें ज्यांच्यापासून प्रवर्तलीं त्या ग्रंथकारांचीं नांवें येणेंप्रमाणें (१) सांख्य- कपिल, (२) योग- पतंजलि, (३) पूर्वमीमांसा- जैमिनि, (४) उत्तरमीमांसा- वादरायण - व्यास, (५) न्याय- गौतम, (६) वैशेषिक- कणाद.

या दर्शनांशिवाय चार्वाकाच्या नांवावर प्रसिद्ध असलेलें लोकायत-  दर्शन म्हणून प्रसिद्ध आहे. त्या दर्शनावरील ग्रंथ उपलब्ध नाहीं. उत्तरमीमांसा नांवाचे जें दर्शन आहे तें वेदांताचा मूळ ग्रंथ समजतात. शंकराचार्यादि आचार्यांनीं यांवर भाष्यें केलीं आणि त्यांतून भिन्न मतें काढलीं.

वेदोत्तर कालानंतरचें एक महत्त्वाचें वाङ्मय म्हटलें म्हणजे महाभारत, रामायण व अठरा पुराणें होत. यांपैकीं महाभारतात राष्ट्रीय ग्रंथ या दृष्टीनें सर्वांत अधिक महत्त्व आहे. जगांत महाभारताएवढा प्राचीन प्रचंड ग्रंथ नाहींच. महाभारत, रामायण व पुराणें इत्यादि ग्रंथांत प्राचीन दृष्टीनें ज्यास इतिहास म्हणतां येईल असें वाङ्मय अंतर्भूत होतें. या ग्रंथाविषयीं येथें सविस्तर माहिती देणे शक्य नांहीं. ती योग्य प्रसंगीं शरीरखंडांत येईलच.

वाङ्मयाचें वर्गीकरण व नामकरण करतांनां वेद, वेदांगे स्मृति, इतिहासपुराणें, सूत्रें, दर्शनें असें सांगून नामकरण करतां येतेंच पण शिक्षणपद्धतीच्या दृष्टीनें दुसरींहि नामकरणें अस्तित्वांत आहेत. त्रयी, आन्वीक्षिकी, वार्ता व दंडनीति हे अभ्यासाचे विषय प्राचीन ग्रंथकार धरीत आले आहेत. त्रयी म्हणजे वेद, आन्वीक्षिकी म्हणजे वादविवादास उपयोगी पडणारीं न्यायादि शास्त्रें, दंडनीति म्हणजे अर्थशास्त्र ऊर्फ शासनशास्त्र होय. यावर शुक्रनीति व चाणक्य, कामंदक इत्यादिकांचे ग्रंथ आहेत. वार्ता या शास्त्राचें ज्ञान आज आपणास नाहीं. या शास्त्रावर ग्रंथ आहेत काय हें आपणास ठाऊक नाहीं.

प्राचीनांनीं व्यवहारोपयोगी ग्रंथ केलेच नाहींत असें नाहीं. साहित्यशास्त्रविषयक. नाट्य आणि संगीत शास्त्र याविषयीं, गणिताविषयीं वगैरे ग्रंथ प्राचीनांनीं तयार केले. तसेंच आयुर्वेदविषयक वाङ्मयहि प्राचीनांनीं बरेच तयार केले. आज देखील प्राचीनांच्या आयुर्वेदविषयक ज्ञानाचा फायदा घेऊन धंदा करणारे लोक बरेच आहे. शिल्पशास्त्र, मूर्तिशिल्प यांविषयीं ग्रंथ देखील दृष्टीस पडतात.

प्राचीनांनीं ज्या दोन ज्ञानांगांकडे अक्षम्य असें दुर्लक्ष केलें तीं दोन अंगे म्हटलीं म्हणजे इतिहास व भूगोलवर्णन ही होत. या बाबतींत मुसुलमानांनीं हिंदूंवर कडी केली. मुसुलमान लोकांनीं ग्रीक लोकांपासून इतिहासलेखनविद्या घेतली. तथापि ग्रीक आणि हिंदू यांचा संबंध आला असतां इतिहासलेखन आणि भूवर्णनलेखन ग्रीकांपासून हिंदूंनीं घेतलें नाहीं. यावरून प्राचीन हिंदूंच्या ग्राहकशक्तीस बराच कमीपणा येतो यांत शंका नाहीं.

व्याससूत्रें आणि भगवद्गीता हे ग्रंथ पुढील परमार्थविषयक तात्त्विक ग्रंथांस आधार झाले. अत्यंत भिन्न प्रकारची मतें या ग्रंथांवर टीका अगर भाष्य या स्वरूपानें निघालीं. त्यांत विष्णुस्वामी, रामानुज, मध्व, वल्लभ, महानुभावमत इत्यादिकांची गणना केली पाहिजे.