प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

एक काल्पनिक संकट.- ब्रिटिश मुत्सद्यांच्या सर्व विचारार्ह गोष्टी जमेस धरल्या तरी सुद्धां ज्याला ज्याला म्हणून हिंदूस्थानच्या अंतर्गत कारभाराची स्थिति माहित आहे त्याला त्याला “हिंदी लोक येऊन आपला प्रांत व्यापून टाकतील” ही स्वसत्ताक वसाहतींनां वाटणारी भीति बरीचशी काल्पनिक आहे असेंच वाटेल. हिंदुस्थानच्या बाहेर राहणार्‍या हिंदी लोकांची संख्या वीस लक्षांहून थोडीशी कमीच आहे आणि यांतले बहुतेक लोक उष्ण प्रदेशांत आहेत. नुसत्या सिलोनमध्येंच ९ लाख लोक आहेत. मॉरिशसमध्यें २।। लाख, ब्रिटिश गियानामध्यें सुमारें तितकेच, व २ लक्ष तीस हजार लोक स्ट्रेट्स सेटलमेंट्स व मलाया स्टेट्समध्यें आहेत. स्वसत्ताक वसाहतींपैकीं फक्त दक्षिण आफ्रिकेच्या वांट्याला बरेच हिंदी लोक आले आहेत. तेथील हिंदी लोकांची संख्या सुमारें १,१६,००० आहे;  पैकीं नुसत्या नाताळ प्रांतांत १,३०,००० हिंदी लोक आहेत. परंतु ही लोकसंख्या आपखुषीनें नाताळांत जाऊन राहिलेल्या लोकांची नव्हे हें लक्षांत घेतलें पाहिजे. यांपैकीं बरेचसे लोक नाताळ प्रांतानें कृत्रिम रीतीनें आपल्या भोंवती जमविलेले आहेत. सन १९११ सालापासून मुदतबंदीच्या मजुरांचा कायदा हिंदुस्थान सरकारानें पास केला. तेथपर्यंत मुदतबंदीच्या मजुरांचा एकसारखा अव्याहत ओघ नाताळकडे चालला होत. व यांतील लोक साखरेचे कारखाने व इतर धंद्याचे कारखाने यांतून मजुरी करीत. बाहेरून येणार्‍या लोकांमुळें होणार्‍या वाढीपेक्षां हिंदी लोकसंख्येची तेथल्या तेथेंच वाढ जास्त झालेली आहे. आस्ट्रेलियाच्या सबंध वसाहतींत ७००० पेक्षां जास्त हिंदी लोक नाहींत. कानडा प्रांतांत १२०० हून अधिक लोक नाहींत. कारण, कानडांतले बरेच अमेरिकेस गेले व कांहिं हिंदुस्थानांत परत आले. या संख्या क्षुल्लक आहेत व त्यांचा विचार हिंदुस्थानच्या सध्यांच्या परिस्थितीकडे पाहून केला पाहिजे. हिंदुस्थानांतील ३० कोट लोकांची आर्थिक परिस्थिति यूरोपप्रमाणें असती, व यूरोपीय लोकांप्रमाणें यांची वृत्ति धाडसी व महत्त्वाकांक्षीपणाची असती तर बरीक आफ्रिकेंतील लोकांनां हिंदी लोकांची वाटणारी भीति सकारण झाली असती. परंतु वस्तुस्थिती आज अशी आहे कीं, हिंदुस्थानांत या गोष्टी मुळींच सांपडत नाहींत. हिंदुस्थानांत मजुरी करणार्‍या लोकांची जरूर अतिशय असून त्या मानानें मजुरांचा पुरवठा कमी आहे. आसामच्या चहाच्या मळेवाल्यांनां मजुरांची भरती करण्यासाठीं वसाहतींशीं विलक्षण चढाओढ करावी लागते. मजुरांचा दुष्काळ ही एक मुंबईच्या गिरण्यांची नेहमींची तक्रार आहे. जसजशी उद्योगधंद्यांची वाढ होत जाईल, शेतकीच्या पद्धतीमध्यें जसजशी सुधारणआ होईल, जसजशी पडीत जमिनीची लागवड अधिकाधिक होईल, तसतसे हिंदुस्थानांतून मजूर कमी कमी बाहेर जाऊं लागण्याचा संभव फार आहे. त्यांतच, हिंदी लोकांनां घर सोडून फार दूर जायला नको असतें या गोष्टीची भर घातली म्हणजे “गोर्‍या लोकांकरितां राखून ठेवलेला देश” काळ्या लोकांनीं व्यापिला जाण्याची भीति अगदिंच निरर्थक नसली तरी ही गोष्ट आजच दृष्टीच्या टप्यांत घेण्यासारखी नव्हे एवढें स्पष्ट होईल. इतक्या क्षुल्लक प्रमाणांतल्या हिंदी लोकसंख्येनें मुत्सद्यांची डोकीं बेताल व्हावीं हें आश्चर्य आहे.

ट्रान्सवालमध्यें जो वाद उपस्थित झाला त्यांचें दुसरें कारण म्हणजे आर्थिक बाबतींत चढाओढ होईल ही भीति होय. ही भीति वरच्याप्रमाणेंच निराधार आहे. कारण ट्रान्सवालमधील हिंदी व्यापार्‍यांचें गिर्‍हाईक नियमित आहे. मुख्यतः आफ्रिकेंतील देश्य लोक, वर्णांकित लोक, व आफ्रिकेमध्यें ज्यांनां “दरिद्री गोरे” अशी संज्ञा आहे ते उडाणटप्पू गोरे लोक, हें यांचें गिर्‍हाईक होय. आतां कधीं कधीं एखादा शिष्ट यूरोपिअन गृहस्थ चोरून मारून यांच्या दुकानांवर येतो, नाहीं असें होण्याचें कारण वरच्या प्रकारच्या लोकांमध्यें गिर्‍हाइकी मिळविण्याचा प्रयत्‍न करणार्‍या यूरोपीय लोकांत हिंदी माणसाइतका मेहनतीपणा, काटकसर, प्रामाणिकपणा व कौशल्य आढळून येत नाहीं हें आहे. वस्तुस्थिति अशी आहे कीं, हिंदी लोकांचा प्रश्न हा केवळ त्यांच्यापुरताच आहे अशी दक्षिण आफ्रिकेंत समजूत नाहीं. दक्षिण आफ्रिका हा गोर्‍या लोकांचा राखून ठेवलेला प्रान्त आहे या प्रश्नाचा निकाल लावतांना निरनिराळ्या वर्णांच्या व जातींच्या लोकांचा जो जास्त व्यापक प्रश्न त्याशीं याचा संबंध येतो ही गोष्ट गोर्‍या लोकांनां विसरतां येत नाहीं. हिंदू लोकांचा हिंदू म्हणून द्वेष करावयाचा असल्या मत्सरी बुद्धीनें दक्षिण आफ्रिकेंतील लोक प्रेरित झालेले नाहींत. हिंदी लोकांचा प्रश्न इतरांपेक्षां बर्‍याच प्रमुखत्वानें पुढें येत असल्याकारणानें हिंदी लोकांची त्यांना विशेष अडचण वाटते इतकेंच. उलट, हिंदी माणसाच्या बाजूनें विचार करतां, त्याला छळणार्‍या अडचणी म्हणजे त्याच्या शीलावर मारलेले वैगुण्याचे, व्यंगाचे, नामुष्कीचे छापच होत असें त्याला वाटतें. असें असल्यानें हिंदी पक्षामध्यें मनोभावनांची उत्कटता विशेष आहे व त्यामुळें हा प्रश्न सोडविणें कठिण होऊन बसलेलें आहे. जनरल स्मट्स यांचें मत हिंदुस्थानाला अनुकूल असल्याचें प्रसिद्ध आहे. व वसाहतींतला सर्वमान्य असा एकच मुत्सद्दी या नात्यानें वॉर कॅबिनेटमध्यें त्यांनीं केलेली हिंदुस्थानची कामगिरी विविध आणि महत्त्वाची आहे. [यानंतर इअरबुककार प्रवचन करतात कीं,] जनरल स्मट्स हिंदी लोकांची स्थिती अतिशय सुधारतील अशी जी विरुद्ध पक्षाला भीति वाटते ती साधार आहे असें जनरल स्मट्स आपल्या कृतीनें दाखवितील यावर लोकांनीं विश्वास ठेवावा. ट्रान्सवालमधील हिंदी लोक व त्यांच्याशीं सहानुभूति बाळगणारे हिंदुस्थांनांतील लोक या सर्वांनीं एवढें ध्यानांत ठेवावें कीं, अशा तर्‍हेची सहानुभूतीची भावना आफ्रिकेंत आहे. आणि म्हणूनच त्यांनीं आजच पूर्ण नागरिकत्वाचे हक्क मागण्याच्या भरीस पडून जनरल स्मट्स यांचा मार्ग निष्कारण अवघड करूं नये यांत त्यांचे हित आहे. अशा तर्‍हेच्या मागण्यांनीं हिंदी लोकांच्या विरुद्ध असणार्‍या पक्षाला हिंदी लोकांनीं स्मट्स व गांधी यांचा १९१४ सालचा करार मोडला असें वाटतें. जनरल स्मट्स यांनीं हा करार सदरहू वाद कायमचा मिटविण्यासाठीं केलेला होता. आणि, “कधींनाकधीं तरी या गोष्टींचा सहानुभूतिपूर्वक विचार करणें सरकारास भाग पडेल” असें अर्थपूर्ण उत्तर गांधींनीं दिल्याचें जरी पत्रव्यवहारावरून दिसून आलें तरी आजच्या काळची विरुद्ध पक्षाची स्थिति लक्षांत घेतां, एकदम जहाल मागण्या मागून, त्यांचा सहानुभूतिपूर्वक तर राहोच, पण नुसत्या रूक्ष कांटेतोल न्यायदृष्टीनें तरी विचार होईल अशी अपेक्षा करणें अदूरदर्शीपणाचें होईल.