प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

ललितविस्तर ग्रंथांतील बुद्धाची कथा - लाषलतविस्तर हा बुद्धचरित्रपर संस्कृत ग्रंथ हिंदुधर्मांतील पुराणांच्या पद्धतीवर लिहिलेला आहे. राम, कृष्ण यांच्याप्रमाणें बुद्ध हाहि एक परमेश्वराचा अवतार आहे अशा पद्धतीचें प्रतिपादन या ग्रंथांत असल्यामुळें हा अवतार घेण्याचें कारण व त्याची पूर्वतयारी यासंबंधाचें वर्णन या ग्रंथाच्या आरंभीच्या प्रकरणांत आहे. इतकेंच नव्हे, तर पुराणांतील, सूत शौनकाप्रत सांगतात या नमुन्यावरहुकूम ललितविस्तरांत भगवान् भिक्षूंच्या विनंतीवरून त्यांनां बुद्धचरित्राची कथा सांगतात, अशीच ग्रंथाची मांडणी केली आहे.

क था नि रू प णा चा प्र सं ग - कोणे एके काळीं भगवान् श्रावस्ती (कोसल देशाची प्राचीन राजधानी उर्फ आधुनिक आयोध्या प्रांतांतील फैजाबाद शहर) नगरीच्या जेतवनानजीक अनाथपिंडद नांवाच्या उपवनांत फिरतां फिरतां येऊन पोहोंचले. त्यांच्याबरोबर बारा हजार भिक्षूंचा समुदाय होता, व शिवाय बत्तीस हजार बोधिसत्वाहि होते. तेथें भगवान् समाधि लावून बसले असतां ईश्वर, महेश्वर, नंद, सुनंद, प्रशांत, महित, इत्यादि अनेक देवपुत्र प्राप्त झाले व त्यांनीं ललितविस्तर ग्रंथांतील कथा सांगण्याविषयीं भगवानास विनंति केली. बोधिसत्त्व व श्रावक यांनींहि तशीच विनंति केल्यावरून भगवान् ती कथा सांगते झाले.

अ व ता र प्र यो ज न- एकदां देवांनीं तुषित येथें वास्तव्य करून असलेल्या बोधिसत्त्वाकडे जाऊन जंबुद्वीपांत अवतार घेण्याबद्दल विनंति केली. तेव्हां बारा वर्षांनीं बोधिसत्त्व मनुष्य अवतार घेईल अशी भविष्यवाणी झालीं. नंतर अनेक देवपुत्रांनीं जंबुद्वीपांत (बौद्ध ग्रंथाप्रमाणें हिंदुस्थानांत) ब्राह्मणाचें रूप घेऊन ब्राह्मणांनां वेद शिकविला.

पुढें तिस-या प्रकरणांत चक्रवर्ती राजांचीं लक्षणें सांगून त्याला चक्ररत्न, हस्तिरत्न, स्त्रीरत्न वगैरे सात रत्‍नें कशीं प्राप्त होतात तें सांगितलें आहे. पुढें बोधिसत्त्वानें कोणत्या कुलांत जन्म घ्यावा याचा विचार करतांना वैदेह, कोशल, वंशराज, वैशाली, प्रद्योत, कंस, पांडु व सुमित्र या प्राचीन भारतीय कुलांचें गुणदोषविवेचन केलें आहे. नंतर बोधिसत्त्वानें ज्या कुलांत जन्म घ्यावयाचा त्या कुलाला अवश्य असलेले चौसष्ट गुण, व ज्या स्त्रीच्या पोटीं जन्म घ्यावयाचा त्या स्त्रीच्या ठिकाणीं अवश्य असलेले बत्तीस गुण सांगितले आहेत. बोधिसत्त्व व देवपुत्र यांनीं वरील सर्व गोष्टी विचारांत घेऊन बोधिसत्त्वानें शाक्य देशांतील शाक्य कुलांतल्या शुद्धोदन राजाच्या मायादेवी नांवाच्या स्त्रीच्या पोटीं जन्म घ्यावा असें ठरविलें.

चवथ्या अध्यायांत, बोधिसत्त्वानें मनुष्यजन्म घ्यावयास जाण्यापूर्वीं जमलेल्या देवपुत्रांनां निरनिराळे एकशें आठ विषय घेऊन धर्मनिरूपण केलें त्याबद्दलची माहिती दिली आहे.

बु द्ध ज न्म सू च क शु भ चि न्हें - पांचव्या अध्यायांत भगवान् भिक्षूंनां सांगतात:-  नंतर बोधिसत्त्वानें मैत्रेय बोधिसत्त्वाला तुषिताचा कारभार पाहण्यास नेमून देवपुत्रांचा निरोप घेतला व जंबुद्वीपांत जन्म घेण्याचा काल निश्चित केला. अवतारापूर्वीं शुभ चिन्हें म्हणून शुद्धोदन राजाच्या राजवाड्यांतील घाण, डांस, चिलटें वगैरे सर्व नाहीशीं होऊन सर्वत्र स्वच्छता झाली; हिमालयपर्वताकडील अनेक जातींचे पक्षी राजवाड्याच्या निरनिराळ्या भागांवर येऊन बसले; आणि बागांतील सर्व झाडें फलपुष्पांनीं भरून गेलीं. मायादेवीनें देहशुद्धीकरतां व मनःशुद्धीकरितां उपवास करण्याचें राजाच्या परवानगीनें ठरवून तें व्रत केलें. अप्सरांनीं राजवाड्यांत प्रवेश करून मायादेवीचें दर्शन घेतलें व तिच्यावर पुष्पवृष्टि केली.

सहाव्या अध्यायांत असें सांगितलें आहे कीं, वसंत ॠतूंत वैशाख महिन्यांत पौर्णिमेच्या दिवशीं प्रशांत समयीं बोधिसत्त्वानें तुषित येथील निवासस्थान सोडून पीतशुभ्रवर्ण, सहा दांत इत्यादि गुणविशेषांनीं युक्त असलेल्या हत्तीच्या रूपानें मायादेवीच्या शरीरांत प्रवेश केला. त्या वेळीं याच गोष्टीचें स्वप्न मायादेवीला पडलें. तें तिनें राजाला सांगितलें; तेव्हां राजानें विचारल्यावरून ब्राह्मणांनीं त्याचा अर्थ असा सांगितला कीं, मायादेवीच्या पोटी एक पुत्र जन्मास येईल व तो चक्रवर्ती राजा होईल, पण पुढें गृहत्याग करून बुद्ध बनेल.

बु द्धा चा ज न्म - सातव्या अध्यायांत भगवान् सांगतातः भिक्षूहो, बोधिसत्त्व जन्माला येण्यापूर्वीं बत्तीस शुभ शकुन झाले. फुलझाडांनां कळ्या आल्या पण फुलें उमललीं नाहींत, फळझाडांनां मोहोर आला पण त्यांनीं फळें धरलीं नाहींत, कपिलवस्तु नगरीकडे हिमालयांतले अनेक सिंह येऊन नगरीभोंवतीं हिंडूं लागले, पांचशें हत्तींनीं त्या नगरींत प्रवेश केला, आकाशांत सूर्यचंद्रतारकागणांचे रथ थांबून राहिले, जिकडेतिकडे सुगंध सुटले इत्यादि. हे शुभशकुन होते. पुढें पूर्ण दहा महिने भरल्यावर मायादेवी प्रसुत होऊन बोधिसत्त्व जन्मास आला. तेव्हां अनेक शुभ गोष्टी घडल्या : आजारी लोक रोगमुक्त झाले, क्षुधिततृषित लोकांची क्षुधातृष्णा शांत झाली, वेडे लोक पुन्हां सुबुद्ध झाले, दरिद्री श्रीमंत झाले व मायादेवीवर अप्सरांनीं पुष्पवृष्टि केली. शुद्धोदन राजानें पुत्रजन्मानिमित्त मोठा उत्सव करून मुलाचें नांव सर्वार्थसिद्ध असें ठेविलें. पुत्र जन्मल्यानंतर सातच दिवसांनीं मायादेवी मरण पावली. पूर्वी जन्म घेतलेल्या बोधिसत्त्वांच्या माताहि सर्व अशाच सात दिवसांनीं मरण पावल्या होत्या; कारण, बोधिसत्त्वाची गर्भाशयांत पूर्ण वाढ झाल्यानें मातेचें हृदय दुभंगून जातें. मायादेवी वारल्यानंतर तिची बहीण वृद्ध गौतमी हिनें राजपुत्राला वाढविलें. हिमवत्पर्वतावर एक असित नांवाचा महर्षि रहात होता. त्यानें अन्तर्ज्ञानानें बोधिसत्त्व जन्मास आल्याचें जाणून, कपिलवस्तु नगरींत जाऊन शुद्धोदन राजाची भेट घेतली. राजानें त्याचा मोठा आदरसत्कार करून त्याला राजपुत्र आणून दाखविला. महर्षीनें त्या राजपुत्रास वंदन करून त्याला जवळ घेतलें; परंतु सर्व शरीरावयवांचें निरीक्षण केल्यावर त्यास वाईट वाटून त्यानें अश्रू गाळण्यास सुरुवात केली. शुद्धोदन राजानें अश्रू गाळण्याचें कारण विचारल्यावरून तो म्हणालाः ''तुझा पुत्र उत्तम लक्षणांनीं संपन्न असून तो मोठा धर्मसंस्थापक होणार आहे. मला वाईट वाटण्याचें कारण एवढेंच कीं, हें बौद्ध रत्न पाहण्यास मी जिवंत राहणार नाहीं, व त्यामुळें मला त्याचा योग्य सत्कार करतां येणार नाहीं ! नंतर असित ॠषीनें राजपुत्राच्या शरीरावरचीं बत्तीस उत्तम लक्षणें व ऐशीं उपलक्षणें राजास समजावून सांगितलीं, व शेवटीं राजाचा निरोप घेऊन तो महर्षि स्वस्थानीं परत गेला.

बुद्धाच्या ईश्वरी अंशाची साक्ष पटविणारे चमत्कार - आठव्या अध्यायाचा सारांश येणेंप्रमाणें आहे : बोधिसत्त्व जन्माला आला त्या दिवशीं क्षत्रिय, ब्राह्मण व शाक्य वंशांतील अनेक कुटुंबांत मिळून वीस हजार मुली जन्मास आल्या होत्या. या सर्व पुढें त्यांनीं बोधिसत्त्वाबरोबर राहून त्याची सेवा करावी म्हणून त्यास अर्पण करण्यांत आल्या. एकदां राजपुत्राला देवालयांत दर्शनास नेण्यांत आलें तेव्हां असा चमत्कार झाला कीं, देवळांतील सर्व देवतांच्या मूर्ती आपलें स्थान सोडून स्वतःच राजपुत्रापुढें येऊन त्याला नमन करत्या झाल्या.

नवव्या अध्यायांत सांगितलें आहे कीं, शाक्य वंशांतील पांचशें लोकांनीं चांगले चांगले दागिने करून आणून राजपुत्राच्या अंगावर घालण्याकरितां दिले. पण ते राजपुत्राच्या अंगावर घालण्यांत आले तेव्हां त्यांचें तेज किंवा चकाकी कांहींच पडेना; राजपुत्राच्या शरीरकांतीपुढें ते सर्व अगदीं फिक्के पडले.

दहाव्या अध्यायाचें तात्पर्य असें कीं, राजपुत्र जरा मोठा झाल्यावर त्याला शिक्षणाकरितां शाळेंत घालण्यांत आलें. त्याच्याबरोबर दुसरीं दहा हजार मुलें होती. शाळेत शिरतांच राजपुत्राचे तेजःपुंज शरीर पाहून तेथील शिक्षक विश्वामित्र यानें आपणच स्वतः त्याला साष्टांग नमस्कार घातला. नंतर बोधिसत्त्वानें विश्वामित्र गुरुजींनां विचारलें : ''तुम्ही मला कोणती लिपि शिकविणार ? ब्राह्मी, खरोष्ठी, पुष्करसारी, अंग, वंग, मागधी; कीं मांगल्य, मनुष्य, शकारी, ब्राह्मवल्ली; द्रविड; कीं देवलिपि, नागलिपि, गंधर्वलिपि, यक्षलिपि, इत्यादि या चौसष्ट लिपीपैकीं मला तुम्ही कोणती शिकविणार ?'' हा अगाध ज्ञान दर्शविणारा प्रश्न ऐकून विश्वामित्र गुरुजी गलितगर्व होऊन व भांबावून जाऊन इतर मुलांनां शिकवूं लागले. बोधिसत्त्वानें आपल्या विद्यार्थी मित्रांनां तेथेच पूर्णज्ञानाचा उपदेश केला.