विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अद्वैत – हे भारतीय विश्वस्पष्टीकरणपर मतांपैकीं एक मत असून यालाच शास्त्रीय परिभाषेंत “केवलाद्वैत”म्हणतात. हे भारतीय तत्त्वज्ञानांतील अत्यंत श्रेष्ठ व पूर्णावस्थेस पोहोंचलेले मत होय, असें ह्या मताचे अभिमानी समजतात आणि भरतखंडात असल्या तर्हेचा विचार करणार्यांमध्यें या मतास इतर मतांपेक्षां अधिक अनुयायी आहेत. ह्या मतास हाणून पाडण्याकरितां मागाहून “विशिष्टाद्वैत”, “शुद्धाद्वैत”, “द्वैत”वगैरे अनेक मतसंप्रदाय अस्तित्वांत आले, व कांहीं काळ त्या मतांचें प्राबल्यहि झालें. तथापि अद्वैत तत्त्वज्ञानाचा परिणाम केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगाच्या सर्वसामान्य विचार-विकासावर होत आहे. हिंदु-संस्थानांत आजच्या काळांत वेदांतावरील निरनिराळ्या ग्रंथांमध्यें शांकर ग्रंथांचेंच अध्ययन अधिक होतें. ॠग्वेदांतील दहावें मंडल वगैरे उत्तरकालीन सूक्तांत दिसून येणारे तत्त्वज्ञानोन्मुख प्रश्नात्मक विचार उपनिषदग्रंथात कसकसे विकास पावत गेले, व ह्या ग्रंथांतील इतस्तत: विखुरलेलें तत्त्वज्ञान “अद्वैतादि” मतांच्या आत्यंतिक सीमेवर कसें जाऊन थडकलें ह्या प्रश्नाचा इतिहास अत्यंत मनोरंजक आहे.
भारतीय तत्त्वज्ञानाचा साकल्यानें थोडक्यांत इतिहास लक्षांत घेतला असतां उपनिषदग्रंथ हेच मूल केवळ याच विचाराला वाहिलेले असे तात्विक ग्रंथ होत असें दिसून येईल. उपनिषदांतील तत्त्वज्ञान रेखीव नाहीं व त्यामुळें सृष्टयुत्पत्तीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर देखील अनन्य असा सिद्धांत उपनिषदांतून आढळत नाहीं. उपनिषदांतील तत्त्वें वेदांत सूत्रांत अधिक निश्चित झालीं, आणि कांहीं सूत्रें दर्शनांत समाविष्ट झालीं. सर्वच दर्शनें उपनिषन्मूलक नाहींत. सूत्रवाङमय रचनाकालांत प्रत्येक दर्शनास बरेंच सुव्यवस्थित स्वरूप देण्यांत आलें. ह्याच कालांत सांख्य, वैशेषिक, मीमांसक, नैय्यायिक वगैरे अनेक सांप्रदायिकांनीं आपापल्या मतांचे सूत्रग्रंथ रचले व आपल्या मतांस बरेंच निश्चित स्वरूप दिलें. सूत्रकारांपैकीं एक प्रमुख आचार्य बादरायण यानें “शारीर सूत्रें” अगर “वेदांत सूत्रें” तयार केलीं. आज उपलब्ध असलेल्या बादरायण सूत्रांत जे बादरायणविषयक उल्लेख आहेत त्यांवरून बादरायण हा सूत्रांचा कर्ता होता कीं नव्हता असा संशय पॉल डायसेन यांनीं उपस्थित केला आहे. या सूत्रग्रंथांत अनेक वेदांत-विरोधी मतांचें खंडण आहे. तथापि यांतील मतें पूर्णपणें आज निश्चित नाहींत. या सूत्रांवर व भगवद्गीतेवर अनेक वेदांताचार्यांचीं भाष्यें होऊन अनेक भिन्न मतें पुन्हां प्रस्थापित झालीं. त्यांतील शांकरमत हें केवलाद्वैत मत होय.
ए. गौह ह्या पाश्चात्य पंडितानें आपल्या “उपनिषदांतील तत्त्वज्ञान”या ग्रंथांत असा सिद्धांत काढला आहे कीं, बाद रायणांनीं वेदांत सूत्रांतून जें `अद्वैत’ मत प्रस्थापित केलें, तेंच परंपराप्राप्त मत शंकराचार्यांनीं प्रस्थानत्रयीवर भाष्यें लिहून पुनरुद्धटित केलें. परंतु याविरुद्ध जॉर्ज थीबो या जर्मन पण्डितानें आपल्या वेदांतसूत्रावरील शांकर भाष्याच्या प्रस्तावनेंत असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे कीं शंकराचार्याकडून `अद्वैत’मताची प्रस्थापना होण्यापूर्वी, म्हणजे सूत्ररचना-कालापासून अद्वैत मतप्रस्थापनकालापर्यंत बौधायन, आत्रेय, आश्मरथ्य, औडुलोमी, काष्णीजिनि, काषकृत्स्न, जैमिनि, बादरि वगैरे अनेक वैदिकमार्गीय आचार्यांमध्यें “अद्वैत” सिद्धांताचा मूल पाया जें जीव व ब्रह्मन् यांचें पूर्ण ऐक्य, त्याजबद्दल तीव्र मतभेद होता, (वेदांत सूत्रें अ. १ पाद ४ सूत्रें २०-२२) व बादरायणाचे सूत्रांत दिग्दर्शित होणारें खरें मत, शंकराचार्यांच्या `अद्वैत’मताशीं जुळतें नसून, रामानुजाचार्यांनीं मागाहून प्रस्थापित केलेल्या “विशिष्टाद्वैत”मताशीच जुळतें असावें.
“अद्वैत” मतांतील अत्यंत महत्वाचा असा जो “मायावाद” तो मूळ प्रस्थानत्रयींतच दिसून येतो, किंवा शंकराचार्यांनीं आपल्या अचाट बुद्धीच्या जोरावर नवीनच शोधून काढला व त्याची आपल्या `अद्वैत’ मतास जपड दिली ह्या संबंधीं देखील आधुनिक पंडितांत बराच मतभेद आढळून येतो. कोलब्रूक वगैरे पंडितांनीं असें प्रतिपादन केलें कीं, “मायावाद” हा मूळ उपनिषदादि ग्रंथांत नसून शंकराचार्यांनीं त्याची नवीन उभारणी केली. परंतु ह्याच्या विरुद्ध ए. गौह यानें असें दाखविलें कीं, “मायावादा”चें प्राथमिक स्वरूप उपनिषदग्रंथांत जागोजाग दिसत असून फक्त त्याची सुव्यवस्थित मांडणी मागाहून करण्यांत आली. वेदामध्येंच मायावादाची पूर्वपीठिका पुष्कळच आहे हें बरेच पंडित विसरतात. अद्वैत तत्त्वाविषयीं किंवा द्वैततत्त्वाविषयीं मांडणी म्हणजे आजकालच्या `मोनिस्ट’आणि `डयुअलिस्ट’ यांमधील मतभेद नव्हे. अद्वैत हें केवळ विश्वस्पष्टीकरणविषयक मत नव्हतें तर तो विशिष्ट आचार आणि उपासना यांचा बोध करणारां आणि माणसें आपणांभोवतीं गुंडाळणारा आणि भिक्षुकी धंद्यावर विशिष्ट परिणाम घडविणारा संप्रदाय होता आणि यामुळें अद्वैताची स्थापना करण्याच्या खटपटीबरोबर दुसर्या कांहीं खटपटी कराव्या लागल्या. ज्या विचारामुळें यज्ञसंस्था दुर्बल झाली अशा प्रकारचे विचारसमुच्चय उपनिषदांत पुष्कळ आहेत. यज्ञसंस्थेस उतरता काळ आला त्याबरोबर केवळ औपनिषद विचारच वाढला असें नाहीं तर बौद्ध संप्रदाय, जैनमत इत्यादि विचारसंप्रदायहि उत्पन्न झाले. भागवत संप्रदायहि अशाच वेळेस उत्पन्न झाला. यज्ञसंस्थेमुळे उत्पन्न झालेलें ब्राह्मण-महत्व या विचारांनीं कमी होणार होतें. उपनिषदांमधून जीं दर्शनें उत्पन्न झालीं त्यांचें कर्तेहि ब्राह्मणच होते. बौद्ध, जैन इत्यादि मतांचे प्रवर्तक ब्राह्मणेतर किंवा तत्संप्रदायानुयायी ब्राह्मण होते. ब्राह्मणांस ब्राह्मणमहत्त्व राखावयाचें होतें त्यामुळें बौद्ध, जैन इत्यादि मतांमुळें जीं दैवतें उत्पन्न झालीं व ज्या उपासना सुरू झाल्या त्यांच्याशीं विरोध करण्याकरितां किंवा त्यांस दुर्बल करण्याकरितां सामान्य लोकांची जीं दैवतें होतीं त्यांना महत्त्व देणें ब्राह्मणांस व संस्कृत ग्रंथकारांस प्राप्त झालें. यज्ञप्रवर्तक आणि यज्ञविरोधी हे पक्ष न राहतां निराळे पक्ष झाले. बौद्ध, जैन वगैरे हा वर्ग एकीकडे आणि वेदांगें रचणारा, दर्शनें उत्पन्न करणारा आणि सामान्य जनांच्या उपासनांचें व सूतकथांच्या वीरांचें महत्त्व गाणारा वर्ग दुसरीकडे अशा तर्हेचे दोन तट पडले. या दोन तटांमुळे जे तत्त्ववेत्ते वेदांगें व दर्शनें यांच्या प्रवर्तकांतून निघाले त्यांस प्रचलित उपास्यांस भजणार्या वर्गापासून तोडवलें नाहीं. कारण तसें करणें म्हणजे आपल्याच पक्षावर आघात करणें होय. ब्राह्मणजातीचें महत्त्व हें तर अद्वैतमतास अगदींच विरुद्ध असणार, तथापि हे विचारप्रवर्तकद्रि ब्राह्मणच पडले तेव्हां जातिमूलक महत्त्व राखावयाचा मोह शंकराचार्यांस देखील सोडवला नाहीं. यामुळें तत्त्वांत अद्वैत मानावयाचें व आचार मात्र निराळा ठेवावयाचा या प्रकारचा प्रचार सुरू झाला. या प्रकारचा विचार व आचार यांच्या विसंगतीमुळें उत्पन्न होणारी तडफड मनीषा-पंचकांत व्यक्त झालेली द्दष्टीस पडते. अद्वैतमताच शंकराचार्यांच्या पंचायतन पूजेशीं संबंध नाहीं आणि जातिभेदाशीं मुळींच नाहीं. शंकराचार्यांच्या आयुष्यात त्यांच्या वैयक्तिक स्थितीमुळें विशिष्ट उपासनांशीं विरोध आणि चातुर्वर्ण्यतत्त्वाचेंच केवळ नव्हे तर जातींच्या उच्चत्व- नीचत्वबोधक विषमतेचें तत्त्व शंकराचार्यांस स्वीकारावें लागलें; आणि इकडे वेदान्ताच्या गोष्टी बोलावयाच्या व ब्राह्मणेतर जातींचा विटाळ मानावयाचा अशी परिस्थिति उत्पन्न झाली.
अद्वैत मत हें केवळ मत म्हणून राहिलें असतें तरी त्याचें महत्त्व होतेंच. पण तें मत केवळ मत म्हणून राहिलें नाहीं तर विशिष्ट उपासना, व विशिष्ट आचार स्थापन करणारें बनलें. शंकराचार्यांचा प्रयत्न अनेक तर्हांचा होता. त्यांस, (१) अद्वैत मताची म्हणजे सर्व विश्व एकद्रव्यमय आहे या तत्त्वाची स्थापना, (२) या तत्त्वास वैदिक आधार आहे या तत्त्वाचें आणि त्याबरोबर वेदांचें समर्थन आणि (३) प्रचलित उपासनांस निराळें स्वरूप देणें, या गोष्टी करावयाच्या होत्या. अनुकूल अशा अनेक उपासनासंप्रदायांशीं झगडावयाचें होतें. शंकराचार्यांनीं बौद्धांचा पाडाव केला नाहीं तर त्यांस कर्म व उपासना मार्गाच्या प्राधान्याचा पाडाव करावयाचा होता. बौद्धधर्माच्या उतरत्या काळीं पुष्कळसे संप्रदाय पुन: वाढले. हे संप्रदाय म्हणजे शैव, वैष्णव, कापालिक वगैरे होत. हे संप्रदाय आस्तिक मताचा पुरस्कार करणारेच होते. परंतु ह्या संप्रदायांतील अनाचार, भीषण कृत्यें, बिकट कर्मकाण्ड वगैरेमुळें कोणाहि खर्या सात्त्विक अंत:करणाच्या पुरुषास अत्यंत किळस आला असता. कारण एकंदर समाजांत, सार्वत्रिक हिताचा विचार करून पुन: बिघडलेली परिस्थिति नीट सुधारण्याची शक्ति फारच थोडया लोकांच्या अंगांत असते. त्या वेळची सामाजिक परिस्थिति, अतिशयोक्ति सोडली तर शांकर दिग्विजयांतील पुढील श्लोकांतून उत्तम तर्हेनें द्दष्टीस पडते:-
वर्णाश्रमसमाचारान्द्विषंति ब्रम्हविद्विष:
ध्रुवन्त्याम्नायवचसां जीविकामात्रतां प्रभो ॥ ३२ ॥
X X X X
शिवविष्ण्वागमपरैलिंगचक्रादि – चिन्हितै:
पाखण्डै: कर्म संन्यस्तं कारुण्यभिव दुजनै: ॥ ३५ ॥
X X X X
सद्य: कृत्ताद्विजशिर: पंड्कजार्चित भैरंवै:
न ध्वस्ता लोकमर्यादा का वा कापालिकाधमै: ॥ ३७ ॥
X X X X
अन्येऽपि बहवो मार्गा सन्ति भूमौ सकण्टका
जनैर्येषु पदंदत्वा दुरंतं दुखमाप्यते ॥ ३९ ॥
अशा प्रकारच्या परिस्थितींत समाजास अंतर्मुख करणार्या एखाद्या समाजधुरीणाची अत्यंत जरूरी होती, व ह्या ऐन आणिबाणीच्या वेळीं आद्य शंकराचार्यांनीं “अद्वैत” मताची मांडणी करून एकंदर जनतेस ज्ञानकांडप्रवण केलें.
अ द्वै त सि द्धां ता चीं मू ल भू त प्र मे यें. –(१) एकच एक आत्मतत्त्व आहे, तन्निष्ठ, तत्सजातीय किंवा तद्विजातीय असें दुसरें कांहीं नाहीं. (२) हें आत्मतत्त्व निर्विशेष असल्यामुळें “हें असें किंवा तसें आहे” असें ह्याजबद्दल कांहींच म्हणतां येत नाहीं. अर्थातच हें निर्गुण असल्यामुळें मांगल्यादि गुण देखील ह्यावर आरोपित करतां येत नाहींत. (३) हें स्वत: ज्ञानस्वरूप आहे. म्हणजे ज्ञान हा याचा गुण नव्हे, आणि म्हणून अर्थातच ज्ञातृत्व, ज्ञेयत्व इत्यादि गुण आत्मत त्त्वाचे ठिकाणीं संभवत नाहींत. (४) परमात्मा स्वरूपत: कूटस्थ नित्य व अद्वितीय आहे. यालाच “ब्रह्माद्वैत” म्हणतात. (५) परब्रह्मच `माया’रूप उपाधीमुळें “ईश्वर”, व `अविद्या’ रूप उपाधीमुळें “जीव” असतो, व जडसृष्टि आभासात्मक असल्यामुळें खोटी ठरते. अर्थात एकच `ब्रह्म’ सत्य. (६) ब्रह्म स्वरूपत: अभिन्न परंतु दिसण्यांत भिन्न अशी
त्रिगुणात्मक “माया” शक्ति हाताशीं धरून जगताची उत्पति करतें किंवा थोडक्यांत बोलावयाचें म्हणजे परब्रह्माचे ठायीं अज्ञानरूपीं मायेमुळें जगताची भ्रांति होते, ज्याप्रमाणें शुक्तीवर रजताची किंवा रज्जूवर सर्पाची. हाच “विवर्त’ वाद. (७) परब्रह्माचाच विवर्तरूप परिणाम असणारें हें आभासात्मक जग मिथ्या होय. (८) ह्या खोटया जगांतच “वेदांत” शास्त्राचा अंतर्भाव होत असल्यामुळें तें शास्त्रहि मिथ्याच होय. परंतु स्वप्नांतील पदार्थांप्रमाणें शास्त्र तत्त्वज्ञानास साधनीभूत होतें. (९) अर्थज्ञानास साधनीभूत प्रमाणें सहा:- प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शुद्ध, अर्थोत्पत्ति व अनुपलब्धि; (१०) जीव हा परमात्म्यापासून अभिन्न असल्यामुळें तो विभु व एकच होय. जीवांचे अनेकत्व औपाधिक. (११) ब्रह्मविचा रास आरंभ करण्यापूर्वी (अ) नित्यानित्यवस्तुविवेक, (आ) इहामुत्रार्थ फलभोगविराग (इ) शमादिषटक संपत्ति मुमुक्षत्व, ह्या साधनचतुष्टयाच्या प्राप्तीची आवश्यकता. (१२) “अहं ब्रह्मास्मि,” “तत्त्वमसि” “सत्यंज्ञानमनंतं ब्रह्म” इत्यादि वेदांत महावाक्यांच्या अखंडानुसंधानानें आत्मसाक्षात्कार झाल्यावर ह्याच लोकीं सदेहमुक्ति मिळते. प्रारब्धकर्माचा क्षय झाल्यानंतर शरीरत्याग झाल्यावर मिळणारी अखंड “विदेह-मुक्ति” प्राप्त होऊन त्या सुखदु:खातीत अवस्थेंत जीव ब्रह्माचें पूर्णैक्य होतें.
शांकरमताचा एक मुख्य विशेष असा आहे कीं त्यांतील देवताशास्त्र, सृष्टिरचनाशास्त्र, मानसशास्त्र, परलोकसंबंधीं कल्पना ह्या संबंधीं कोणतीहि गोष्ट विचारांत घेतली तरी तिला दोन स्वरूपें असलेलीं आढळतात. उदाहरणार्थ, परमार्थत: निर्गुण, निष्क्रिय, शांत, निरंजन असें ज्ञानस्वरूप परब्रह्म व्यावहारिक द्दष्टीनें परमेश्वर या संज्ञेस प्राप्त होतें, व अशा रीतीनें ह्या दोन्ही स्वरूपांचा संबंध केवळ आभासरूप असतो. पारमार्थिक द्दष्टया सृष्टिरचना म्हणजे सत्स्वरूपाचेंच प्रकाशन असून, व्यवहारद्दष्टया मात्र अनंत कालापासून “धाता यथा पूर्वकल्पयन्” सारखी विश्वाची उत्पत्ति, स्थिति व लय हे सारखे चालू असतात, व अशा रीतीनें हें संसारचक्र अबाधितपणें चालू असतें. परमार्थिकद्दष्टया प्रत्येक जीव हा परब्रह्मस्वरूप असून त्यानें स्वत: व्यवहाराकरितां स्वीकारलेल्या अविद्यारूप अध्यासामुळें मात्र त्यास उपाधि प्राप्त होतात व त्यामुळें “मी, तूं”असे भेद पडतात. ब्रह्मसूत्रावरील भाष्योपोद्धाताचे आरंभीच श्रीशंकराचार्य म्हणतात – “मी” “तूं” ह्या दोन कल्पनांनी दर्शविण्यांत येणारे विषयी व विषय हें प्रकाश व अंध:कार याप्रमाणें विरुद्ध स्वभावाचे असून त्यांचें कधींहि ऐक्य होणें शक्य नाहीं हा आपल्या रोजच्या व्यवहारांतील अनुभव आहे. मग त्यांचे प्रत्येकाचे धर्म एकमेकांशी कसे जुळणार ?
इतर सर्व गोष्टींतल्या प्रमाणेंच मोक्ष व त्याचीं साधनें ह्यामध्येंहि दोन स्वरूपें द्दष्टीस पडतात. साधनामध्यें निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार करून देणारी ती पराविद्या – “परा यथा तदक्षर-मधिगम्यते” आणि अपरा विद्येंत वेदवेदांगें इतर सर्व शास्त्रें यांचा अंतर्भाव केलेला आहे. अपराविद्येनें सगुण ब्रह्माची प्राप्ति होते व पराविद्येनें ज्ञानस्वरूप जें परबह्य त्याशीं तादात्म्य होतें असा शांकर मताचा अभिप्राय आहे. अशा रितीनें एकदा ब्रह्मसाक्षात्कार झाले म्हणजे
भिद्यते ह्रदयग्रंथिच्छिद्यंते सर्व संशया: ।
क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन्द्दष्टे परावरे ॥
अंत:करणाची गांठ सुटून तें स्वतंत्र होतें व सर्व संशयांचा नाश होतो, त्याचप्रमाणें ब्रह्मसाक्षात्कार झाला असतां त्याला कर्मेहि करावयाचीं शिलज्क रहात नाहींत.
“अ द्वै त ” सं प्र दा या चें वा ङ म य. –श्रीमच्छंकराचार्यांनी “अद्वैत” मताची प्रस्थापना केली व ह्याच्याच जोडीला भारतवर्षांतील चार दिशांस चार सांप्रदियिक मठांची स्थापना करून आपले पट्टशिष्य, पद्मपाद, सुरेश्वराचार्य, तोटक, हस्ता मलक चित्सुखाचार्य इत्यादींकडून “अद्वैत” मतावर पुष्कळच वाङमय तयार केलें. पुढें जोडलेल्या ग्रंथांच्या यादीवरून अद्वैत संप्रदायांतील ग्रंथांचा विस्तार दिसून येणार आहे. श्रीमदाद्यशंकराचार्यांनी जरी मूळ अद्वैत मताची प्रस्थापना केली असली तरी बर्याचशा गोष्टींतील दोष मागाहूनचे भाष्यकार व स्वतंत्र ग्रंथकार ह्यांनीं काढून टाकून एकंदर अद्वैत मताची सुंदर व व्यवस्थित मांडणी केली.
एकंदर अद्वैत मताच्या अफाट ग्रंथसागरात चित्सुखा चार्यांची “चित्सुखी” मधुसूदनसरस्वतीची “अद्वैतसिद्धि” व श्रीहर्ष पंडितकृत “खंडनखाद्य” हे तीन मुख्य ग्रंथ होत. ह्याशिवाय नैष्कर्मसिद्धि, सिद्धांतलेख इत्यादि ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणें सदानंदकृत वेदांतसार, धर्मराजकृत वेदांत परिभाषा, आद्य शंकराचार्यकृत उपदेशसाहस्त्री, अपरोक्षानुभूति इत्यादी सुलभ ग्रंथ अद्वैत मताच्या अभ्यासकांस प्राथमिक अवस्थेंत उपयोगी पडण्यासारखे आहेत. ह्या सर्वं ग्रंथांमध्यें जे जे ग्रंथ मागाहून विरोधी सांप्रदायिकांचें खंडण करण्याकरितां
रचले गेले त्यांमध्यें जास्त जास्त क्लिष्टता व शब्दावडंबर आढळून येतें.
“अ द्वै त” म त हें ता त्वि क वि चा रा ची प र मा व धि.– भारतीयांचें तत्त्वज्ञान उपनिषदूग्रंथांत प्रादुर्भूत होऊन त्याची एकंदर परिणति सांख्यांच्या चोवीस किंवा पंचवीस तत्त्वांमधून व वैशेषिकांच्या सप्तपदार्थांमधून होत होत क्रमाक्रमानें तेच तत्त्वज्ञान तीन, दोन अशीं तत्त्वें मुख्य कल्पून सरतेशेवटीं एका अविभाज्य, अवर्णनीय तत्त्वावर कसें येऊन थडकलें याचा विचार वर केलाच आहे. परंतु ऐतिहासिक द्दष्टया पाहिले तर शंकराचार्यांमागून, रामानुजाचार्यांनी “ विशिष्ठाद्वैत ”मताची प्रस्थापना केली. त्यानंतर मध्वाचार्यांनीं `द्वैत’ व वल्लभाचार्यांनीं “शुद्धद्वैत” अशीं दोन मतें प्रस्थापित केलीं. आतां या चारी मतांमध्यें कांहीं बाबतींत मतवैचित्र्य व कांहीं बाबतींत मतैक्यता होती.
यांपैकी श्रीशंकराचार्य ज्ञानमार्गांचे पुरस्कर्ते, मायावादाचे उपस्थापक व चित्तशोधनासाठी कर्मोपासनांचें ग्रहण करणारे आहेत. श्रीरामानुजाचार्यांस ज्ञानाइतकीच कर्मोपासनांची जरूरी भासत असून हे मायाविरोधी व भक्तिप्रतिपादक आहेत. पूर्णद्वैती श्रीमन्मध्वाचार्यं हे कट्टे मायाविरोधी असून या आचार्यांनी भक्तीचें माहात्म्य विशेष वाढवून जीवानें नित्य परेशसेवा करावी असें ठरविलें. श्री वल्लभाचार्यं हे पूर्ण अद्वैत मान्य करितात परंतु मायेचा सर्वथा विरोध करतात. यांनींहि भक्तिमार्गाचा अतिरेक केला असून माध्व संप्रदाय व वल्लभ संप्रदाय ह्यामुळें ज्ञानमार्ग कांहीं थोडासा संकुचितच झाला. जीव व जगताचें स्पष्टीकरण करण्यासाठीं शंकराचार्यांनीं “विवर्तवाद” अंगीकारला, व असतें तसें कां दिसत नाहीं ह्याबद्दल एक स्पष्टीकरण जगापुढें मांडलें. रामानुजांनी `परिणाम’वादाचा अंगिकार करून जीव व जगत् हे ब्रह्माचे (ज्याप्रमाणें दहीं हा दुधाचा परिणाम आहे) परिणाम होत, असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मध्वाचार्यांनी “आरंभवाद” स्वीकारून विष्णुस्वरूप ब्रह्मानें जीव-जगतादि उत्पन्न केलें असें दाखविण्याची खटपट केली. वल्लभाचार्य यांनीं अविकृत परिणामावादाचाच स्वीकार केला.
अशा रीतीनें ह्या विरोधी तत्त्वज्ञांमधील मतभेद पाहिले असतां असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, शंकराचार्यांनीं पारमार्थिक विचाराची परमावधि समजलें जाणारें असें जें `अद्वैत’ त्याची प्रस्थापना केल्यावर इतर आचार्यांनीं पुन: त्याविरुद्ध कोणत्या कारणामुळें खटपट वादविवाद वगैरे केली असावी ? परंतु या चारहि मतांच्या सूक्ष्म निरीक्षणावरून असें दिसून येतें कीं केवळ समाजधारणेकरिता म्हणून रामानुजादि संप्रदायस्थापकांनी शंकराचार्यांस विरोध केला. कारण केवलाद्वैत सिद्धांत जरी सर्वंत: खरे मानण्यासारखे आहेत तथापि अद्वैत सिद्धांताचें साम्राज्य झालें असतां अनधिकारी उन्मत्त व उन्मार्गगानी होण्याचा फार संभव दिसतो. सामान्य जनता अद्वैतांतील सूक्ष्म विचार आकलन करण्यास असमर्थ असल्यामुळें “अहंब्रह्मास्मि” यासारख्या महावाक्यांचा देखील “ॠण कृत्वा घृंत पिबेत्” यासारख्या चार्वाकाच्या देहात्मवादांत शेवट होण्याचा अत्यंत संभव असतो व ह्या सार्वत्रिक अज्ञानजन्य अध:पातास भिऊनच जनतेच्या सुरक्षिततेकरितां मागील आचार्यांनीं आपलीं अद्वैत विरोधी मतें प्रस्थापित केलीं असावींत, व माध्वांनीं शंकराचार्यांवर “प्रच्छन्न बौद्ध”त्वाचा आरोप केला त्याचें कारण देखील “अद्वैत” मत हें थोडयाशा विकृत स्वरूपांत विज्ञानवादी बौद्धाच्या मताजवळ येतें हेंच असावें असें कांहींचें म्हणणें आहे. शिवाय अद्वैत मतास विरोध करतांना त्यांतील कांहीं गोष्टींकडे उत्तर कालीन आचार्यांनीं डोळेझांक केली. कारण जगत् मिथ्या म्हणणें हें केवळ पारमार्थिक द्दष्टया होय. व्यावहारिक द्दष्टीनें शंकराचार्यांनीं जग जीव-परमेश्वर यामध्यें भेद मानलाच आहे. व शंकराचार्यांच्या मायावादाचें महत्त्व याच एका गोष्टीनें द्दष्टोत्पत्तीस येतें. कारण मायावाद हा जणूं उपनिषद ग्रंथांतील अद्वैतपर वाक्यांचा समन्वय करून दाखविणारी दुधारी तलवारच होय असे अद्वैत वादाचें समर्थन करणार्यांचें म्हणणें आहे. त्याचप्रमाणें विविधतेंतच ऐक्य पाहण्याकरितां देखील मायावादाचाच अत्यंत उपयोग होतो. कारण मायेचें अस्तित्व व्यावहारिकच असल्यामुळें व्यवहारांत सर्व प्रकारच्या विविध तेस वाव आहेत व पारमार्थिकद्दष्टया मायाच अस्तित्वांत नसल्यामुळें पूर्ण ऐक्यच शिल्लक राहतें. असें अद्वैत वादाचें समर्थन करण्यांत येतें.
मागाहून प्रस्थापित झालेल्या वैदिक मतांचें सूक्ष्म निरीक्षण केले असतां असें दिसून येईल कीं रामानुजांनीं आपलें “विशिष्ठा-द्वैत” मत ज्यास सांख्यांचा “परिणाम वाद” (Evolution theory) म्हणतां येईल त्यावर उभारलें. त्याचप्रमाणें मध्वाचार्यांनीं आपल्या `द्वैत’ मताची मांडणी करण्याकरितां नैय्यायिकांच्या परमाणुकल्पनेचा स्वीकार करून त्याला “आरं-भवादाची” जोड दिली. वल्लभांचा पुष्टिमार्गप्रधान भक्तिसं-प्रदाय दिसण्यांत अद्वैत असला तरी त्याची मांडणी तीव्र भावनांच्या ऐक्यावरून केलेली दिसते. अशा रितीनें शंकराचार्यास विरोध करण्याकरितां मागाहून झालेल्या संप्रदायप्रवर्तकांनीं स्वीकृत केलेली मतें शंकराचार्यांच्या पूर्वीचींच आहेत, फक्त मागाहूनच्या आचार्यांनीं आपल्या बुध्दिकौशल्यानुरूप त्यांत थोडे बहुत फेरफार केले, व ह्या द्दष्टीनें पाहतां शंकराचार्यांनीं प्रस्थापित केलेलें नवीन मतच अत्यंत महत्त्वाचें आहे व हीच विचारविकासाची परम सीमा होय असें अद्वैत मार्गी मानतात.
अ द्वै त म ता चा किं ब हु ना भा र ती य त त्त्व- ज्ञा ना चा ज गां ती ल वि चा रा व र प रि णा म:- सांप्रत जगांत हयात अशा महंमदी, ख्रिस्ती वगैरे संप्रदायांनीं स्वीकारलेला आरंभवाद ( निर्माणवाद ) हा उच्च तत्त्वज्ञानांतील अगदी प्राथमिक अवस्थेचा होय, व ह्या द्दष्टीनें पाहतां मध्वाचार्यांच्या निर्माणवादावर उभारलेला `द्वैत’ सिद्धांत वरील परकीय संप्रदायांच्या जवळ आहे हें स्पष्ट आहे. पाश्चात्य जगांत दिसून येणारी आध्यात्मिक प्रवृति व संस्कृति, ग्रीक संस्कृतीपासून उद्भूत झाली आहे, व प्लेटो, साकॅटीस, पायथॅगोरस इत्यादि ग्रीक तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथ व भारतीय आध्यात्मिक ग्रंथ यांचा तुलनात्मक द्दष्टीनें विचार करतां आत्म्याचें अमरत्व, पुनर्जन्म वगैरे कल्पना ग्रीकतत्त्ववेत्यांनीं भारतीय तत्त्वज्ञानापासूनच थोडया विकृत स्वरूपांत उचलल्या आहेत हें आधुनिक शास्त्रीय शोधांवरून सिद्ध झालें आहे. तौलनिक भाषाशास्त्राचा जनक सर वुइल्यम जोन्स हा एकें ठिकाणीं म्हणतो:- “भारतीयांच्या उच्च, स्पष्ट, विशद व व्यापक तत्त्वज्ञान-पद्धतीशीं ग्रीक तत्त्वज्ञानपद्धति ताडून पाहतां ग्रीक लोकांचें तत्त्वज्ञान भारतांतूनच तिकडे गेलें असलें पाहिजे, असा निष्कर्षं काढल्याशिवाय राहवत नाहीं.”
ह्या वर उल्लेखिलेल्या निर्माणवादापेक्षां विकासवाद ( परिणामवाद ) आधुनिक शास्त्रास जास्त सम्मत आहे. आधिभौतिक सर्व शास्त्रें ह्या विकासवादावर उभारलेलीं आहेत, परंतु शास्त्रीय ज्ञानाची अशी एक हांव असते कीं, असें एक शास्त्र आपल्या हस्तगत व्हावें कीं ज्याच्या योगानें या सर्व चरावर विश्वाचा उलगडा करतां येईल. पाश्चात्य शास्त्रें असें ऐक्य शोधून काढण्याच्या खटपटींत आहेत. परंतु “अद्वैत” मतानें विवर्तवाद उत्पन्न करून त्यापूर्वीच पुढील मार्ग मोकळा केला आहे. असें त्या संप्रदायाच्या अनुयायांचें म्हणणें आहे. ज्यांनीं ज्यांनीं तत्त्वज्ञानासंबंधानें विचार केला आहे, ते ते पुरुष पाश्चात्य असोत व पौरस्त्य असोत, वैदिक असोत किंवा अवैदिक असोत, तत्त्वज्ञानाच्या साम्राज्यांत ते केवळ एक अद्वितीय वस्तूशिवाय बाकीच्या सर्व वस्तूं गौण समजतील. प्लेटो, कँट, अज्ञेयवादी स्पेन्सर किंवा हक्स्ले इत्यादि प्राचीन अर्वाचीन कोणीहि तत्त्वजिज्ञासू घेतला तरी तो नि:शब्द निष्कंलक ऐक्याचा शोध करीत असल्याचें दिसून येतें. परंतु पाश्चात्य जगास आपलें ध्येय अद्याप प्राप्त झालेलें नाही. तथापि शर्यतींतील घोडयाप्रमाणें आत्यंतिक सुखापाठीमागें भरधांव पळतां पळतां सरतेशेवटीं पाश्चात्य शास्त्रें'' “अद्वैत” मताच्या विर्वत वादावर विसावा घेण्यास येतील अशी भारतीय अद्वैती तत्त्वज्ञान्यांची खात्री आहे.
[ वाङमय:- वेदान्तसार-सदानंद; वेदान्तपरिभाषा-धर्म-राज; ब्रह्मसूत्रभाष्य-शंकराचार्य; गीताभाष्य-शंकराचार्य; उप-निषद्भाष्य-शंकराचार्यं; पंचपादिका-सुरेश्वराचार्यं; चित्सुखी-चित्सुखमुनि; खण्डनखाद्य-हर्ष; अद्वैतसिद्धि-मधुसूदनसर-स्वती; पंचदशी-विद्यारण्य; मांडुक्योपनिषदि गौडपाद-कारिका-गौडपाद; सिद्धांतलेश-अप्पय्यादीक्षित; नैष्कर्म्य-सिद्धि-सुरेश्वर; उपदेशसाहस्त्री-शंकराचार्य; अद्वैतकामधेनु-उमामहेश्वर; अद्वैतकालामृत-नारायण पंडित; अद्वैतकौस्तुभ-भट्टोजी दिक्षित; अद्वैतचंद्रिका-अनंतभट्ट; अद्वैतचिंताकौ-सतुभ-महादेवानंद; अद्वैतचिंतामणी-रंगनाथ; अद्वैतज्ञान-सर्वस्व-मुकुंदमुनि; अद्वैततत्त्वदीप-नित्यानंद; अद्वैततरं-गिणी-रामेश्वशास्त्री; अद्वैतदर्पण-भुजराम; अद्वैतदीपिका-विद्यारण्य; अद्वैतदीपिका-नृसिंहाश्रम; अद्वैतनिर्णय-अप्पय्या-दीक्षित; अद्वैतनिर्णयसंग्रह-तीर्थस्वामिन्; अद्वैतपंच-पदी-शंकराचार्य; अद्वैतपरिशिष्ट-केशव; अद्वैतप्रकाश-रामानंदतीर्थ; अद्वैतबोधदीपिका-नृसिंहभट्ट; अद्वैतब्रह्म-विद्यापद्धति-नंदीश्वराचार्य गोपालाश्रम; अद्वैत ब्रह्मसिद्धी-सदानंद काश्मिर; अद्वैतभूषण ( ? ) अद्वैतमकरंद-लक्ष्मीधर कवि; अद्वैतमंगल-मधुसदनवाचस्पति; अद्वैत-मंजरी-मधुसूदनवाचस्पति; अद्वैतमतसार-मधुसूदनवाच-स्पति; अद्वैतमुक्तासार-लोकनाथ; अद्वैतमुखर-रंगराज; अद्वैतरत्न-रंगराज; अद्वैतरत्नकोष-अखंडानंद; अद्वैतरत्न कोष-नृसिंहाश्रम; अद्वैतरत्नरक्षण- मधुसूदनसरस्वती; अद्वैतस्य मंजरी-नल्ला पंडित; अद्वैतरहस्य-रामानंदतीर्थ; अद्वैतरीति-नृसिंह पद्माश्रमिन्; अद्वैतवाद-नृसिंहाश्रम; अद्वैतविद्याविचार-वेंकटाचार्य; अद्वैतविद्याविजय-महाचार्य; अद्वैतविवेक- ज्ञाधरभट्ट; अद्वैतविवेक-रामकृष्ण; अद्वैत-वैदिकसिद्धांतसंग्रह-नरसिंह; अद्वैतशास्त्रसारोद्धार-रंगोजी- भट्ट; अद्वैतसिद्धांतविवेचन-ब्रह्मानंद सरस्वती; अद्वैतसिद्धांत विवेचन-विद्यानंद सरस्वती; अद्वैतसिद्धि-मधुसूदन सरस्वती;
अद्वैतसिध्दि-सहजानंद तीर्थ, अद्वैतसिध्दिखंडन-वनमालिन्; अद्वैतसूत्रभाष्य-शंकराचार्य; अद्वैतानंद-ब्रह्मानंद; अद्वैतानंद- लहरी-वेंकट शास्त्री; अद्वैतानंदसागर- रघूत्तमथीर्थ; अद्वैता-नुभूति-रघूत्तमतीर्थ; अद्वैतामृत-जगन्नाथसरस्वती; अद्वैते-श्वरवाद-रघुनाथ; इ०]